शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत हल्लाबोल
“मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
महाराष्ट्र संवाद न्यूज
हिंगोली – भाजपमध्ये सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते आता फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले असून शासन आपल्या दारी थापा मारते लय भारी अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढविला.
हिंगोलीत निर्धार सभा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभा झाली. सभेत ठाकरेंनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा डिवचल्याचे पाहायला मिळाले.
ठाकरे म्हणाले, डबल इंजिन सरकारला आणखी एक अजितदादांचा डबा लागला आहे. तुमच्या पक्षात चांगले नेते नाहीत का? तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मत मागण्याची हिंमत नाही का असा सवाल करत सध्या भाजपमध्ये निष्ठावतांच्या हाती केवळ दांडा उरला असून झेंडा दुसराच फडकवतोय, अशी परिस्थिती आहे. असा घनाघात करत एनडीएचा आता अमिबा झाला आहे. आम्ही इंडियाचे नाव घेऊन पुढे आलो असताना, आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीन बरोबर केली जात आहे. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्याबरोबर असलेल्या शेतकरी अतिरेकी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
डिवचल: “मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचं सोडून दिलं आहे. मी काहीही म्हटलं तरी त्याचा बोभाटा होतो. मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो.
त्यानंतर कार्यकर्त्यांमधून टरबूज असा शब्द आला. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी “टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं”,असं सांगत पुढे “मी असं काही म्हणत नाही, अजिबात म्हटलेले नाही.” असे म्हटले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला.
उद्योग परत आणाल का?: राज्यात दुष्काळ पडलेला असताना फडणवीस जपानला गेले. तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले. तुमचा हा प्रयत्न उत्तम आहे. परंतु, तुमच्या सरकारमध्ये जे प्रकल्प जपानला गेले ते माघारी आणाल का? मोदीजी म्हणाले होते मोठा उद्योग देतो, कुठेय उद्योग? जे उद्योग राज्यात आले होते ते तुमच्या डोळ्यादेखत गुजरातला गेले. जपानऐवजी गुजरातला गेलेले ते उद्योग परत आणणार आहात का? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा, ” असा चिमटाही ठाकरेंनी यावेळी फडणवीसांना काढला.


