महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – ठेवीदारांना 81 कोटी रुपयांचा गंडा घालून या रकमेचा अपहार करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शुक्रवारी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चौकशीसाठी उपस्थित राहणार असून संबंधित ठेवीदार कर्जदार तक्रारदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी केले आहे.
राजकीय प्रतिष्ठितांचा समावेश: 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी प्रतिष्ठित राजकीय नेता भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य, राहुरीतील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय यांच्यासह पंधरा मुख्य आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची मालमत्ता संरक्षित करणार: याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत बँकेच्या व्यवस्थापकासह पाच आरोपींना अटक केली असून सध्या ते कोठडीत आहेत. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी नव्याने महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 वाढविल्यानंतर आता संबंधित आरोपींच्या मालमत्ता संरक्षित करून त्या ताब्यात घेण्यासाठी व तसे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.
आरोपी अद्याप बाहेरच: संगमनेर पोलिसांकडून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांनी काढत आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने प्रथमतःच मोठी घडामोड समोर येत आहे. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पाच आरोपींना अटक केल्यानंतर लगेचच या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. त्यानंतर आत्तापर्यंत या तपासात कोणतीही समाधानकारक प्रगती झाली नाही.
आवाहन: आता पोलिसांनी या प्रकरणात ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी (MPID) कायद्याअंतर्गत गुन्हेगार असलेल्या प्रतिष्ठित आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळविण्यासाठी ठेवीदार, तक्रारदारांच्या साक्षी व जाबजबाब घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (8 सप्टेंबर) दुपारी बारा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
तपास अधिकारी संगमनेरमध्ये: खातेदारांच्या अथवा ठेवीदारांच्या रकमा परस्पर खात्यावरून ट्रान्सफर करून अथवा रोख स्वरूपात काढून घेऊन ज्यांची फसवणूक झाली आहे अशा संबंधितांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असले तरी आरोपींची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता तपास अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी संघर्षशील राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

