महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती होत आहे. ही यात्रा देशाच्या भविष्याला व राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. या यात्रेचा आपणा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार या यात्रेचे समन्वयक काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेरात पदयात्रा: राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भारत जोडो यात्रा पार पडली. यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी थोरात बोलत होते.
यांचा सहभाग: संगमनेर नगरपरिषदेपासून सुरू झालेल्या या पद यात्रेचा समारोप नवीन नगर रस्त्यावर झाला. यावेळी थोरात यांच्या समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिकचे राजाराम पानगव्हाणे महिला काँग्रेसच्या सचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, काँग्रेस हा बलिदान आणि त्यागाची परंपरा असलेल्या पक्ष आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्याची महत्त्वपूर्ण दहा वर्ष तुरुंगात काढली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हा देश व लोकशाही टिकवण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3560 किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेत ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन चालत होते. विविध संघटना व लोकशाहीवर विश्वास असणारे सर्वजण एकत्र येत होते.
जनसंवाद यात्रा: महाराष्ट्रात देगलूरपासून सुरू झालेली यात्रा सात जिल्ह्यातून गेली. राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व शेगावची झालेली ऐतिहासिक सभा हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य ठरले. ऊन, वारा, पाऊस असा प्रवास करत या यात्रेतून बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. तोच संदेश घेऊन आपल्या सर्वांना पुन्हा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काम करायचे आहे.
स्वायत्त संस्थांचा गैरवापर: देशात व राज्यात वातावरण बदलले आहे. जाती व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपाची मोजक्या राज्यांमध्ये सत्ता राहिली आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मनिपुर अशांत आहे, महिलांवर सर्वत्र अत्याचार होत आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. कुस्तीगीर मुलींचे आंदोलन दडपले गेले. मराठा, धनगर, यांच्यासह विविध समाजाचे आंदोलन दडपले जात आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार मूळ प्रश्नांवर भर देण्याऐवजी जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करत आहे. इडी व सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे.
परिवर्तन नक्की: लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपपुढे आव्हान निर्माण केले. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. इंडिया नावाचा त्यांनी धसका घेतला आहे. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन नक्की असून काँग्रेसचा समतेचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उत्कर्षा रूपवते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मिलिंद कानवडे यांनी केले तर सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले…
लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी भाजपाविरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. देशात सर्वत्र अशांतता आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. जाती धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
पदयात्रेचे शहरात अभूतपूर्व स्वागत…
पदयात्रेत नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा आमदार थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विविध ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण केले, तरुणाईचा मोठा जल्लोष, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजीत या पदयात्रेत रिमझिम पावसातही सर्व समाज बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले. भारत जोडो, नफरत छोडो… थोरात साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी संगमनेर दुमदुमून गेले.

