महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
थोरातांनी केली होती मागणी: तीन-चार दिवसांपूर्वी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणी पाठोपाठ पालकमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे घोषणा केल्याने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
मंत्री विखेंच्या सूचना: गत आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे गांभीर्याने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्री विखे पाटील यांनी शनिवारी यासंदर्भात पुन्हा आढावा घेतल्यावर उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे काम पूर्ण होतात कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन निश्चित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली होती चाचणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 31 मे 2023 रोजी निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली होती. निळवंडे प्रकल्पाच्या डावा कालवा व त्यावरील शाखा कालव्यांच्या शेवटपर्यंत केवळ बारा दिवसांमध्ये सुमारे 120 किलोमीटर लांबीत यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते.
विचारात घेतली ही बाब: प्रकल्पाचा डावा कालवा दोन ते अठ्ठावीस किलोमीटर हा अकोले तालुक्यातील निंब्रळ, माळादेवी मंदिर व कळस या भागातून जातो. हा भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्याने एका बाजूला डोंगर व कठीण खडकातील खोदाई व दुसऱ्या बाजूला 14-15 मीटर उंचीचे माती भराव काम करून कालव्याचे काम करण्यात आल्याने कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले. तसेच काही भागात खडक सछिद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्याने खडकातील सापामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीवेळी निदर्शनास आले होते. या कारणामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली.
काम गतीने करण्याच्या सूचना: कालव्यांची दुरुस्ती न करता पाणी सोडल्यास व पुन्हा पाझर झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो, याबाबत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला इशारे देऊन ठेवले असल्याने ही बाब लक्षात घेत कठीण खडकाच्या भागात कालवा तळामध्ये आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे, मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाय योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहे.
प्लास्टिक कागदाचा वापर: मात्र अकोले तालुक्यात पावसामुळे काळी माती उपलब्ध होण्यास व काँक्रीट काम शीघ्रगतीने करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाने उघडीप दिल्यास उपरोक्त कामे पूर्ण करून क्रॉस रेगुलेटर व रिटेनिंग वॉलचे काम सुरक्षित पातळीपर्यंत आणून आवश्यकता भासल्यास मोठी गळती असलेल्या भागात प्लास्टिकच्या कागदाचा वापर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

