महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा वाजता संगमनेरमध्ये घडला. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोरात विरोधात गुन्हा दाखल: शुभम थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. मालदाड रोड, संगमनेर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
रात्री घडली घटना: सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या तहसीलदार मांजरे यांच्या मोबाईलवर दहा ते बारा कॉल करण्यात आले होते. मात्र झोपेत असल्यामुळे तहसीलदारांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे शुभम थोरात याने तहसीलदार राहत असलेल्या मालपाणी नगरमधील त्यांच्या घरी जात मेन गेटचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला.
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी: तहसीलदारांच्या घराशेजारी राहत असलेल्या राजाराम चत्तर यांनी त्यांना फोन करून आपल्या गेटचा दरवाजा कोणीतरी मोठमोठ्याने वाजवत असल्याचे सांगितले. तसेच तो व्यक्ती गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चत्तर यांच्या घराचा दरवाजा वाजवत तहसीलदारांना आवाज आवाज देत होता.
त्यानंतर त्या व्यक्तीने तहसीलदारांच्या घराची बेल वाजवून दारावर थाप मारल्याने तहसीलदारांनी दरवाजा उघडला असता आरोपीने तुम्ही माझा फोन का उचलत नाही अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. तुमची काही अडचण असेल तर उद्या ऑफिसला या असे तहसीलदारांनी त्याला सांगितले असता काही एक कारण नसताना त्याने विनाकारण तहसीलदार मांजरे आणि शेजारी राजाराम राजाराम चत्तर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करतच आरोपी परत निघून गेला.
तहसीलदारांनी दिली फिर्याद: सकाळी कार्यालयात आल्यानंतर चौकशीअंती तहसीलदारांना रात्री घरी आलेल्या व्यक्तीचे नाव शुभम थोरात असल्याची माहिती समजली. त्यानंतर तहसीलदार धीरज मांजरे यांनी शहर पोलीस ठाण्यात थोरात यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस तपास: थोरात यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाळू धोरणाचा फज्जा: दरम्यान हे प्रकरण वाळू तस्करीशी संबंधित असल्याची चर्चा आहे. पोलीस चौकशीनंतर या प्रकरणातील माहिती समोर येणार आहे. संगमनेरसह राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाचा तालुक्यात पुरता फज्जा उडाला असून वाळू उपसा सुरूच आहे. यामागील मोठे अर्थकारण यास कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यातून वाळू तस्कर मुजोर झाल्याचे दिसते.
फोन उचलला नाही म्हणून तहसीलदारांना घरी जाऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी… संगमनेरातील घटना!
नेमका प्रकार काय? पोलिसांनी शोध घेण्याची मागणी

