महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
राजकीय प्रतिष्ठेचा बुरखा अंगावर चढला की एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनतेला सहज उल्लू बनविता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे. बँकेतील ठेवीदारांच्या तब्बल 81 कोटींच्या ठेवींचा गैरवापर करून या रकमेचा अपहार करणाऱ्या प्रतिष्ठितांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना अटक होत नसल्याने या गुन्ह्याच्या तपासावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायासाठी दबावाची आवश्यकता: दहा वर्ष कारखान्याचा व्हाईस चेअरमन, मावळत्या जिल्हा परिषदेचा सदस्य यासह संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून अध्यक्ष राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह 21 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 81 कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल होऊन महिना होत आला तरी देखील या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अद्यापही आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाही. एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना या राजकीय प्रतिष्ठितांचा पत्ता माहिती नाही यावर सामान्य माणूसही विश्वास ठेवणार नाही. आरोपींपर्यंत पोलीस पोहोचत नसल्याने आता ठेवीदारांनी याप्रकरणी एकजूट दाखवत यंत्रणेवर आपला दबाव वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ठेवीदारांनी गुन्हे दाखल केल्यास प्रकरणाला मिळू शकते कलाटणी: येनकेन प्रकारे नुकसान झालेच आहे तर आता किमान आपल्या कष्टाच्या पैशाचा अपहार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ठेवीदारांनी कुटेसह बँकेच्या व्यवस्थापनाविरोधात स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्याची आवश्यकता आहे. ठेवीदारांनी गुन्हे दाखल केल्यास या प्रकरणाला आणखी बळकटी मिळू शकते असे देखील या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
तपास थंडावला: गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सुरुवातीलाच पाच आरोपींना अटक करत या तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला त्याच शहर पोलिसांकडून घाईघाईने तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आणि त्यानंतर या प्रकरणात एकाही आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेला अटक करण्यात यश आले नाही.
मुख्य आरोपींना अभय कोणाचे: विशेष म्हणजे या प्रकरणातील पंधरापैकी चौदा मुख्य आरोपी अद्यापही बाहेर आहेत. यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह काहीजणांना न्यायालयाने सुनावणीपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला असला तरी अन्य आरोपींनी मात्र अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही. ते परिस्थितीचा अंदाज घेत आहे, तरीदेखील हे आरोपी मात्र अद्यापही गुन्हे शाखेच्या रडारवर आलेले दिसत नाहीत.
सन 2000 पासून चौकशीची गरज: दरम्यान याप्रकरणी लेखापरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोजकेच गुन्हेगार पोलीस दप्तरी नोंदविले गेले असल्याचे बोलले जाते. 2016 ते 2021 या दरम्यानच्या काळात हा अपहार झाल्याचा ठपका चेअरमन भाऊसाहेब कुटेसह त्याच्या घरातील लोक, राहुरीतील प्रतिष्ठित कदम कुटुंबीय यांच्यावर ठेवला असला तरी या प्रकरणाची सन 2000 पासून चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जाते.
कर्मचाऱ्यांचीही व्हावी चौकशी: तसेच 2000 पासून आतापर्यंत दूधगंगा नागरी पतसंस्थेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचीदेखील चौकशी होण्याची आवश्यकता या प्रकरणात निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्त्रोतापेक्षा जास्तीच्या मालमत्ता आढळल्यास त्या कशा आल्या याची चौकशी झाल्यासही या आर्थिक गैरवहाराला आणखी वेगळी कलाटणी मिळू शकते अशी देखील चर्चा आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला तर त्यांच्या हाती बरेच काही लागेल आणि ठेवीदारांना देखील न्याय मिळेल यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याच्या मुळाशी जायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


