महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तीन वर्षापूर्वी त्याने तिला पळवून आणत तिच्याशी म्हसोबा मंदीरात लग्न करून नोटरी करीत बायकोचा दर्जा दिला. आणि तिनेच साथीदाराच्या मदतीने नवऱ्याची गळा चिरून हत्या केल्याचा गुन्हा संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
संगमनेर शहरालगत संगमनेर खुर्द शिवारात प्रवरा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना समजली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना हा मृतदेह मारुती आबा डामसे (वय 41 वर्ष, रा. कोपरे ता. जुन्नर जि. पुणे हल्ली रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर) याचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
घटनास्थळी नदीपात्रालगत खडकावर मृत मारुती आबा डामसे याच्या चपलालगत रक्ताचे डाग आढळून आले. तसेच प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर मारुती डामसे याचा गळा चिरल्याचे दिसून आले.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत मारुती डामसे याच्या भावाने फिर्याद दिली असून आपल्या भावाचा खून भावजयीने साथीदारांच्या मदतीने केल्याचे म्हटले आहे. पांडुरंग आबा डामसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझी पत्नी, भाऊ मारुती डामसे व त्याची पत्नी दिपाली असे चौघेजण संगमनेर खुर्द येथील रमेश पंढरीनाथ सुपेकर यांच्या घरासमोरील शेडमध्ये राहावयास असून सुपेकर यांची शेती वाट्याने करून गुजरान करीत आहे.
भाऊ मारुती हा सुपेकर यांच्याकडे वाट्याने शेती करत असून याचा पहिला विवाह झाला असून त्याचा घटस्फोट झाल्यानंतर त्याने तीन वर्षांपूर्वी गावाकडून कोपरे ता. जुन्नर जि. पुणे येथील विवाहिता दिपाली हिला पळवून आणत तिच्याशी म्हसोबा मंदिरात लग्न केले. व दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते. पती-पत्नीतील वादामुळे दिपाली ही माहेरी निघून गेली होती.
रक्षाबंधनाला ती संगमनेरला एक दिवस मुक्कामाला थांबून भावाकडून पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी निघून गेली होती. बुधवारी (१३ सप्टेंबर) संध्याकाळी आठ वाजता जेवण करत असताना भावाला फोन आला होता. फोनचा स्पीकर फोन करून भाऊ बोलत असताना समोरून येणाऱ्या महिन्याचा आवाज हा भावजयीचा होता. तिने ती म्हसोबा मंदिराजवळ आल्याचे सांगितले. त्यानंतर भाऊ मारुती एकटाच मंदिराच्या दिशेने निघून गेला. बराच वेळ होऊन देखील तो परतला नव्हता. त्यामुळे त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद आल्याने फिर्यादी पत्नीसह त्याला शोधण्यासाठी गेले असता तो आढळून आला नाही. तो कुठेतरी गेला असावा असे वाटल्याने हे दाम्पत्य पुन्हा घरी निघून आले.
गुरुवारीदेखील (१४ सप्टेंबर) तो घरी न परतल्याने फिर्यादीने शेतमालक रमेश सुपेकर यांना याची माहिती देत त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.
शुक्रवारी फिर्यादी व त्याची पत्नी म्हसोबा मंदिराजवळील शेतात घास कापण्यासाठी गेले असता फिर्यादीची पत्नी जवळच प्रवरांना तिकडे गेले असता तिला पाण्यात एक माणूस तरंगताना दिसून आला. तिने फिर्यादीला आवाज दिला असता फिर्यादीने तेथे जाऊन बघितले असता मृतदेह पाण्यात पालथ्या अवस्थेत तरंगत होता. नदीपात्रालगत पडलेल्या चपलांवरून मृतदेह भावाचा असल्याचे फिर्यादीची खात्री पटली.
यासंदर्भात शहर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेह नदीच्या पाण्यातून काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाचा गळा चिरलेला असल्याने आपल्या भावजयीने अज्ञात साथीदाराच्या मदतीने भावाचा खून केल्याची तक्रार केल्याने दिपाली डापसे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहे.

