सामान्यांचे सरकार भारीच… अधिकारी लोकप्रतिनिधीच नव्हे तर कोणालाही जुमानेना!
प्रांताधिकारी, तहसीलदार आढावा बैठक सोडून पालकमंत्र्यांच्या बैठकीला…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
संगमनेर – राज्याचे माजी महसूल मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार या दोघा शासनाच्या प्रमुख प्रतिनिधींनीच दांडी मारण्याचा प्रकार समोर आला. टंचाई आढावा बैठक सोडून हे दोन्ही अधिकारी पालकमंत्र्यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने संगमनेरमधील दुष्काळाचे या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यामुळे थोरात देखील संतप्त झाल्याने त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
डझनभर टँकर सुरू: संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पठार भागामध्ये डझनभर टॅंकरने दुष्काळी जनतेला पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने सर्वत्र पाठ फिरवल्याने तालुक्यातच नव्हे तर राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना तालुक्याचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्रांताधिकारी तहसीलदारांनी या दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असताना आमदारांनी बोलाविलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीतील बैठकीला या अधिकाऱ्यांनी राज्यातील मातब्बर मंत्र्याच्या आशीर्वादाने दांडी मारली असल्याचे दिसून आले.
दुपारी शहरात सायंकाळी शहराबाहेर: संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे प्रशासनाचे प्रमुख म्हणून संगमनेरमध्ये काम पाहत आहेत. दुपारपर्यंत संगमनेरमध्येच असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी सायंकाळी मात्र आमदार थोरात यांनी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला दांडी मारल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी टंचाई परिस्थिती संदर्भात माहिती दिली.
प्रशासनाने जनतेसाठी काम कराव: दरम्यान हे दोन्ही अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरात म्हणाले, चार दिवसांपूर्वी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठक अत्यंत महत्त्वाची असून वर्षातून एखाद-दोन वेळेसच टंचाई आढावा बैठक होत असते. या महत्त्वाच्या बैठकीकरता प्रांताधिकारी व तहसीलदार ही अनुपस्थित राहतात हे योग्य नाही, असे वागणे बरोबर नाही. या काळात जनतेच्या मदतीसाठी प्रशासनाने काम करावे याबाबत आपण काळजी घेतली. मी देखील अनेक वर्ष महसूल, कृषी खात्यासारखे महत्त्वाचे विभाग सांभाळले आहे. मात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या बैठकांसाठी स्वातंत्र्य दिले.
हे वागणं बरं नव्हं: संगमनेरमध्ये टंचाई परिस्थितीवर महत्त्वाची बैठक असताना प्रांताधिकारी तहसीलदारांना पालकमंत्र्यांना याबाबत सांगता आले नाही का? तालुक्याचे संपूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी टंचाई आढावा बैठकीला उपस्थित असताना हे दोन्ही अधिकारी पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी निघून गेले, अधिकाऱ्यांचे हे वागणे बरे नाही. या बैठकीबद्दल महसूलमंत्र्यांना कल्पना दिली असती तरी ते याच असे म्हणाले असते असे मला वाटत नाही. हे मंत्र्यांना सांगितले तरी हरकत नाही. पालकमंत्री पालक असतात ते त्रास द्यायला नसतात असे देखील थोरात म्हणाले.

