महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथे शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) रात्री गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली आहे.
गाईचा मृत्यू: गेल्या महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी तालुक्यात दमदार सुरुवात केली आहे. रात्री संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात गावातील आण्णासाहेब बाबुराव नेहे यांच्या गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली असून गोठ्यातील गव्हाच्या भुश्यानेही पेट घेतला होता.
दुर्घटना टळली: या दुर्घटनेत सुदैवानं इतर फार मोठी जीवीत हानी झाली नसली तरी नेहे यांना यामुळे आपली गाय गमवावी लागले आहे.
वरिष्ठांकडून पाहणी: ही माहिती आण्णासाहेब नेहे यांनी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळविली असता नेहे यांनी घटनास्थळी पाहणी करून याबाबतची माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना कळविली.
यांनी केले शव विच्छेदन: डॉ. संकेत भोर, डॉ. सुनील शिदोडे, डॉ. शिवाजी फड यांच्या पशुवैद्यकीय टीमने गायीचे शवविच्छेदन केले तर कामगार तलाठी रत्नप्रभा गागरे, ग्रामसेवक माधुरी शिखरे यांनी घटनेचा पंचनामा केला.
यांची उपस्थिती: यावेळी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे, डॉ. दत्तू नलावडे, रामभाऊ नेहे आदी उपस्थित होते.


