संगमनेर कारखाना देणार कार्यक्षेत्रातील ऊसाला 2835 रुपयांचा भाव
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सरकार गेलं आणि आपल्याला त्रास सुरू झाला. तालुक्यातील विकास काम बंद केले गेले. दहशत निर्माण करून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतीने येथील विकास थांबणार नाही. ते मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
यांची उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद उपस्थित होते.
थोरात म्हणाले, मागच्या अडीच वर्षाचा कार्यकाल बघितला तर सरकारमध्ये येऊ असे वाटले नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार बनविणे शक्य नव्हते. मात्र योगायोगाने महाविकास आघाडीचे सरकार बनले आणि महसूल मंत्रीपद आपल्याकडे आल्यानंतर निळवंडेच्या कामाला गती दिली. मात्र अडीच वर्षानंतर सरकार गेले आणि त्रास सुरू झाला. खोटे दंड, खोट्या केसेस सुरू झाल्या.
म्हणून गणेशमध्ये लक्ष घातले: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधी उमेदवार देण्यात आले मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट आठ वर्षात त्यांनी काही केले नाही म्हणून आम्ही गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले. आणि सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिला. गणेश कारखाना चांगला आहे. कार्यक्षेत्रात ऊस आहे. तो कारखाना चालू करून चांगला चालवायचा आणि नंतर चालवायला त्यांच्याकडेच द्यायचा, अशी भूमिका आहे. ते मोडायला इकडे येत असले तरी आम्ही चांगले घडवायला तिकडे जातो. तेथे निश्चितच चांगलं करून दाखवू.
कारखान्याचा आलेख चढता: सहकार महर्षी थोरात कारखान्याचा आलेख सतत चढत्या क्रमांकाचा राहिला आहे. कारखान्याची वाटचाल यशस्वी राहिली. भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकतेच्या पायावर कारखान्याचे उभारणी केली त्यांनी ठरवून दिलेल्या आदर्शला कोठे धक्का लावायचा नाही या विचाराने काम करताना आम्ही कारखान्यात बदलसुद्धा विचारांती घेतले. भाऊसाहेब थोरात यांच्या धोरणामुळे सामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला.
घटते टनेज: सरासरी उसाचे टनेज घटत असल्याबद्दल खंत व्यक्त करत टनेज वाढले तर ऊस शेती परवडणारी ठरेल. चाळीस-पंचेचाळीस टक्के ऊस कार्यक्षेत्रात असून 55-60 टक्के ऊस बाहेरून आणावा लागतो, ही परिस्थिती बदलण्यासाठी कार्यक्षेत्रात पुरेशी ऊस लागवड आवश्यक आहे. साखर कारखानदारीत अनेक महत्त्वाचे बदल घडत आहेत. राज्यातील साखर कारखानदारी एक लाख आठ हजार कोटींचे उलाढाल होत असून येत्या पाच वर्षात ती अडीच हजार कोटींवर जाईल. को जनरेशन मधून सहा कोटी बत्तीस लाख युनिट विजेची निर्मिती झाली असून 6.89 रुपये प्रति दराने ही वीज विकली जात आहे.
डॉ. तांबे म्हणाले, संगमनेरचा समावेश राज्यातील संपन्न समृद्ध तालुक्यांमध्ये होतो, सूक्ष्म नियोजनामुळे हा कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून संबोधला जातो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी येथील सहकाराचा पाया घातला तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यावर कळस चढवला आहे. पुढील काळात लाटेवर वाहून न जाता लोकशाहीची सुरू असलेली कुचबना थांबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मनाला प्रश्न पडले पाहिजे. मनाला नको मात्र मेंदूला चरे पडले पाहिजे असे ते म्हणाले.
अध्यक्ष प्रताप ओहोळ यांचे देखील यावेळी भाषण झाले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी विषय वाचन करून सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.
कारखाना देणार एफआरपीपेक्षा जास्तीचा भाव…
यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर्षी 2715 रुपयांचा एफआरपी चा भाव निश्चित झाला असून थोरात कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2835 रुपयांचा भाव देणार असल्याची घोषणा आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


