महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला. अमृतवाहिनी महाविद्यालयाचे बस स्थानकापर्यंत काम झाल्याने लगेचच त्याच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या पूर्णतेनंतर उद्घाटन केले असते तर बरे झाले असते. श्रेयवादासाठीचा तमाशा संगमनेर शहराने मंगळवारी अनुभवला. केवळ नगरपालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे त्याच्या देखाव्यासाठी हा उद्घाटनाचा अट्टाहास होता का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी उपस्थित केला आहे.

कानकाटे म्हणाले, संगमनेरमधील जनता भोळी नाही, ती सर्व जाणून आहे. ती तिसरा नेत्र उघडेल तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनतेची ताकद काय असते ते कळेल. जनतेला कायम गृहीत धरून काम करणे योग्य नाही.
अमृतवाहिनी ते बस स्थानकापर्यंत काम पूर्णत्वास गेले आहे. आता रायतेवाडी फाट्याकडून संगमनेर खुर्द पर्यंतचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी गडकरी यांनी या कामासाठी निधी दिला तर त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधींना कार्यक्रमाला का बोलावले नाही? गणेशोत्सवाच्या गर्दीत उद्घाटनाची घाई का? असा प्रश्न उपस्थित करत शहरात अनेक महत्त्वाचे विषय असून ते दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरात युवा पिढी कामाविना बेकार आहे. त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. शहरात मटका, दारू, गांजा, पत्त्याचे क्लब, सावकारी, हुक्का बार, बिघडत चाललेली तरुण-तरुणी, छुपे अनैतिक व्यवसाय, गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून हे अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे हे देखील पाहिले पाहिजे. यामुळे संगमनेरात भविष्यात मोठे गुन्हेगारी वाढून त्याचा फटका शहराला बसणार आहे.
या प्रश्नात देखील संगमनेरातील प्रत्येक राजकीय नेत्याने, पक्षाने लक्ष घातले पाहिजे. आम्हीच कसे मोठे हे दाखवून कामापुरता फायदा करून घेण्याचे प्रकार सुरू असून यामुळे निस्वार्थी कार्यकर्ता मागे पडत आहे. पुढे येत आहे तो फक्त लाभार्थी. पद, पैसा या माध्यमातून लॉबिंग करून कामे मिळविणारा. अनैतिक धंदे करणारा. बगलबच्चे हाताशी धरून कामे करणारे युवा नेते. त्यामुळे ही वाईट अवस्था दूर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, हे ओळखण्याची गरज असून वेळीच जागे व्हा, असे कानकाटे यांनी म्हटले आहे.

