महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानक या ‘हॅपी हायवे’चे लोकार्पण होत आहे. तालुक्यात फोनाफोनी झाली. मात्र हा तालुका एक परिवार आहे. संगमनेरच्या विकासात ज्या-ज्या वेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला त्या-त्या वेळी हा तालुका एकवटला आहे. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. आनंदाच्या क्षणी सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती मात्र काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक या हॅप्पी हायवेचे लोकार्पण मंगळवारी संध्याकाळी थोरात यांच्या हस्ते स्ट्रीटलाईट सुरु करून करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक मनीष मालपाणी, विविध मान्यवरांसह हजारो संगमनेरकर रिमझिम पावसातही उपस्थित होते. नव्याने झालेल्या मार्गावर एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे लोकार्पण समारंभ अशा स्थितीतही संगमनेरकरांचा जल्लोष दिसून आला.
या मार्गावर सनई चौघडे ढोल ताशांचा निनाद, वीज दिव्यांचा लखलखाट, टाळ्यांचा गजर, फटाक्याची आतिषबाजी यात साहशी खेळ, दांडपट्टा तलवारबाजी या खेळांनी लक्ष वेधले. बास्केटबॉल, स्केटिंग, पारंपारिक नृत्य, झुंबा, तायकोंडो, कबड्डी, लाठी-काठी, तलवारबाजी, फुगडी, वारकऱ्यांचे भजन, संभळ वाद्य याच्यासह अनेक तरुणांनी परिधान केलेले पारंपारिक ड्रेस महिलांनी घातलेल्या पैठण्या, सुहासिनीनी केलेली ओवाळणी या कार्यक्रमातून हा सोहळा पार पडला. मालपाणी परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आर्यनगाला व इमॅजिका ऑर्केस्ट्रा याला प्रतिसाद मिळाला.
थोरात म्हणाले, महसूल मंत्री असताना नितीन गडकरी यांच्याशी संपर्क येत होता. त्यांची महसूलशी संबंधित कामे करत असताना आपण या मार्गासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या प्रेमापोटी या मार्गासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे पत्र दिले. यात राज्य सरकारकडून आणखी भर घालण्यात आली महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मार्गासाठी 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. आजच्या आनंदमय सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केले होते. राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र यावे, ही अपेक्षा होती. मात्र आपला आनंद काही लोकांना बघवत नाही. त्यांनी कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले.
पावसात रंगला आनंद सोहळा…
संगमनेर तालुका एक परिवार असून आनंदात व संकटात सर्व तालुका एक होतो याची प्रचिती या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा आली. पाऊस सुरू असतानाही हजारो संगमनेरकर रस्त्यावर उतरून थोरात यांच्या नेतृत्वाखाली या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.


