संगमनेर पंचायत समितीचा महिला शिक्षिकांसाठी उपक्रम
महाराष्ट्र संवाद न्यूज
कोविड कालावधीनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की, त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती आणि त्यातून कळत नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे गांभीर्य समजावून सांगत त्याचे धडे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगणक तज्ञ वैशाली खैरनार यांनी केले.
उपक्रमशील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकारातून संगमनेर पंचायत समितीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व महिलांसाठी सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे, राजेंद्र भालारे उपस्थित होते. अशोक देशमुख यांच्या ताण तणावाचे व्यवस्थापन, पारंपरिक मैदानी खेळाचे आयोजन अशा विविध उपक्रमाचे हे या काळात आयोजन करण्यात आले होते.
खैरनार म्हणाल्या, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिलांसाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या काळात भ्रमणध्वनी आवश्यक झाला असून महिलांनी आपला भ्रमणध्वनी दुसऱ्याच्या हातात देताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे पांढरपेक्षे तंत्रस्नेही गुन्हेगार आपल्या अवतीभवती असू शकतात. आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नये. सायबर सुरक्षा केवळ माहितीच नाही तर आपल्या प्रणालीला व्हायरसच्या हल्ल्यापासून देखील सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
सायबर खुण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सांगताना इंटरनेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी बनावट ई-मेल संदेश वापरणे, वैयक्तिक माहितीचा गैरवापर करणे, हॅकिंग, वेबसाईट किंवा संगणक नेटवर्क बंद करणे, त्याचा गैरवापर करणे, द्वेष पसरवणे, दहशतवादाला उत्तेजन देणे, बाल पॉर्नोग्राफी वितरण करणे, अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ आदींचा सायबर गुन्ह्यात समावेश होतो. आपले चुकून पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिल्यास अथवा व्हायरल केल्यास त्याविरुद्ध आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. त्यासाठी तीन ते सात वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे.

महिला सायबर साक्षर झाल्यास भविष्यातील अनर्थ टळू शकते समाज माध्यमांचा महिलांनी योग्य पद्धतीने वापर करायला हवा. सोशल मीडिया वाईट आहे असे नाही मात्र तो आपण नक्की कशासाठी आणि किती वेळ वापरायचा हे कळायला हवे. सततचे स्क्रोलिंग, विद्वेष, झुंडशाही, गॉसिप आणि नकारात्मकतेपासून दूर राहायला जमले तर खूप काही शिकता येते. व्हाट्सअप स्टेटसला अथवा फेसबुकला अपलोड करत असलेल्या फोटोचा एआयद्वारे तंत्रस्नेही गुन्हेगार गैरवापर करू शकतात, याची महिलांनी जाणीव ठेवली पाहिजे.
कोणत्याही प्रकारे सोशल मीडिया हॅक झाल्याची शंका आली असल्यास तसेच कोणीही ऑनलाईन धमकी दिल्यास त्वरित सायबर पोलिसात तक्रार करणे गरजेचे असत आपण जेवढे लवकर तक्रार करू तेवढ्या लवकर सायबर गुन्ह्यांना आळा बसू शकेल. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, झूम लिंक तयार करणे, भ्रमणध्वनी व संगणकाचा अध्यापनासाठी प्रभावी वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले.
खैरनार यांनी सुनंदा कानवडे, सरिता फणसे, कमल फटांगरे, अनिता नेहे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. राजेंद्र कासार यांनी बनवलेल्या शाडूच्या गणेश मूर्तीची यावेळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली कडलग यांनी तर सूत्रसंचालन दिपाली रेपाळ यांनी केले. अंजली मुळे यांनी आभार मानले.
शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनामध्ये केला तर शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी व प्रभावी होऊ शकेल याचबरोबर महिला शिक्षकांसाठी स्वतःची सायबर सुरक्षा महत्त्वाचे आहे. यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. – अनिल नागणे गटविकास अधिकारी, संगमनेर पंचायत समिती.


