आरोपी औरंगाबाद खंडपीठात जाण्याच्या तयारीत, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका आरोपींच्या पथ्यावर
”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचा विसर पडू देऊ नये, नागरिकांची अपेक्षा!
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
शेकडो ठेवीदारांचे लक्ष लागलेल्या आणि तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजकीय पुढारी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून आठ दिवसांचा कालावधी उलटत आला आहे. शिवाय सलगपणे आलेल्या सुट्ट्यामुळे अद्याप आरोपी औरंगाबाद खंडपीठात पोहोचू शकलेले नाही अशा स्थितीत अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील एकाही व्हाईट कॉलर क्रिमिनलपर्यंत अद्यापही पोहोचता आले नाही.
संगमनेर शहर पोलिसांकडून हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला आहे. मात्र यालादेखील तब्बल महिनाभराहून अधिक कालावधी उलटत असून दूधगंगा नागरी पतसंस्था अपहार प्रकरणात कोणतेही प्रगती होताना दिसत नाही. आरोपींचे राजकीय संबंध बघता तपास यंत्रणेवर वरिष्ठ स्तरावरूनच राजकीय दबाव असल्याच्या आणि जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय, औरंगाबाद येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज अहमदनगर येथील संदीप दगडू जरे यांच्यापैकी एकाही आरोपीला जिल्हा पोलीस अद्याप पकडू शकले नसल्याने या चर्चेला पुष्टी मिळू लागली आहे.

अनेक गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे नसताना देखील जिल्हा पोलीस दल आपले कौशल्य वापरून विविध गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करत परराज्यातूनही त्यांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल करण्यात यशस्वी ठरलेले आहे. असे असताना या व्हाईट कॉलर क्रिमिनल्सचे नाव, पत्ते सर्व काही पोलीस दप्तरी उपलब्ध असताना देखील विशेष म्हणजे आरोपी कुटुंबीयांसह फरार असताना हेच कौतुकास पात्र ठरलेले पोलीस या राजकीय प्रतिष्ठित आरोपींपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
25 सप्टेंबरला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे व अमोल भाऊसाहेब कुटे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहे. कुटे आता आपल्या परिवारासह औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम अजित कृष्णराव कदम सुजित कृष्णराव कदम यांच्यासह अहमदनगर येथील संदीप दगडू जरे हे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असून याशिवाय सहाय्य करणाऱ्या सहा जणांसह 21 जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झालेला आहे.
मात्र सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांचा कालावधी वगळता नंतर या गुन्ह्यात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसते. त्यामुळे याप्रकरणी छोट्या पडद्यावरील सीआयडी मालिकेतील “दया कुछ तो गडबड है!” या डायलॉगची चर्चा आता संगमनेरच्या सहकारात सुरू झाली आहे.


