रविवार विशेष @ प्रवीण पुरो
सत्ता मनसोक्त भोगता आली पाहिजे, यासाठीचे प्रयत्न फोल ठरू लागले की राजाला काही सूचत नसत. तो कासावीस होई. ज्यांच्या सहकार्याने सत्ता राबवायची प्रसंगी त्यांचेच गळे त्याने घोटले. असे गळे घोटत मध्यवर्ती सरकारच्या राजाने सहकार्यांचं अस्तित्वच नाकारलं. एकेका राजकीय पक्षाची पाळेमुळे नेस्तनाबुत झाल्यावर राजाने बोरुबहाद्दरांच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली. विरोधकांची मुस्कटदाबी करून कोणीही मान वर करणार नाही, असा प्रयत्न राजाने करून पाहिला. त्यात तो यशस्वीही झाला. अनेक हौसे, नवसे, गवसे राजाला जाऊन मिळाले. राज्यातल्या सत्ता त्याने मस्तीच्या जीवावर आपल्याकडे घेतल्या. तरी राजा समाधानी नव्हता. अपेक्षित असलेला सत्तेचा फायदा मिळू न शकल्याने प्रजाही नाराज होती. दिलेला शब्द राजाला खरा करता आला नाही. यामुळे राजाविषयीची नाराजी घर करत गेली. अशातही सत्ता मिळालीच पाहिजे, या आसक्तीसाठी राजाने नको त्या मार्गांचा अवलंब सुरू केला. पहिल्या सत्तेसाठी त्याने आपल्या घराजवळच आगी लावल्या. नंतर आपल्याच सरदारांवर हल्ला करवला. अनाकलनीय घटनांचा फायदा राजाने घेतला. खोटं बोलण्यात राजा माहीर होता. सारखं खोटं बोलल्याने प्रजेलाही तो खरं वाटू लागला. पुन्हा सत्ता मिळाली. पण तिचाही वापर प्रजेला नकोसा झाला. विकत घेतलेल्यांना ताब्यात ठेवता-ठेवता राजा नाकीनऊ आला. सत्तेची हाव अति होऊ लागल्याने लोकांनाही त्याचा उबग आला. उघडपणे त्यांची रेवडी उडवली जाऊ लागली. सत्तेचा मामला एकमार्गी होता. राजाला अपेक्षित असलेला बडेजावपणा फारसा उपयोगी आला नाही. जो कोणी विरोध करेल त्याचा बिमोड करायचा आणि स्वत:चं स्थान अधिक बळकट करायचं, असा मानस राजाच्या मनाने घेतला. दारासमोरच्या आंदोलनाकडे त्याने पाठ फिरवली. थंडीने कडकडून 800 जण मेले तरी राजाच्या तोंडावरची माशी हलली नाही. महिलांची छेडछाड करणार्यांना त्याने राजाश्रय दिला. जातीतल्यांची बेअब्रु त्याने नजरेआड केली. सत्तेच्या जोरावर राजा मस्तवाल बनू लागला होता.
ही आहे भरतनगरीच्या राजाची गोष्ट. राजा कधी 20 वर्षं तर कधी 30 वर्षं भिक मागून जगत होता. कधी त्याने नसलेल्या रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचं काम केलं. दुसर्यांच्या दाक्षिण्यासोबतच्या छबीसाठी तो सैरभैर व्हायचा. तसं विवाह होऊनही त्याने तो लपवला होताच. यामुळे नजरेला नजर भिडवताना त्याला काहीच वाटत नसे. सत्ता त्याच्या डोक्यात इतकी गेली होती की त्याला सत्तेविना सारं क्षणभंगूर वाटायचं. सत्तेसाठी विरोधकांच्या मागे विडी लावली, व्हीसीआयला त्यांच्यावर सोडलं. असल्या नसल्या प्रकरणांचा वापर करत त्याने एकेकाला अद्दल घडवली. विरोधी राज्य सत्तेतल्या मंत्र्यांनाही त्याने सोडलं नाही. त्यांनाही तुरुंगात डांबलं. हे करण्यासाठी त्याने तोंडी केलेल्या आरोपांचाही वापर करून घेतला. सत्तेची गणितं जुळवण्यासाठी कोणतेही मार्ग चोखाळण्याची राजाची तयारी होती. तो आधीच उघडा झाला होता.
विरोधकांची बाजू घेऊन आपल्या विरोधात बोरू झिजवणार्या आणि दांडूधार्यांना त्याने नकोसं करून ठेवलं. त्यांच्या मुसक्या आवळण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला. अनेक दांडुधार्यांना त्याने घरी बसवलं. त्याच्या मनातल्या गोष्टी खोट्या ठरवणार्या दांडूधार्यांना नोकर्या सोडायला लावल्या. ज्यांनी नोकर्या सोडल्या नाहीत त्यांच्या नोकर्या करणार्या पत्नींना त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या सरकारी नोकरीत होत्या, त्यांच्या दूर दूर बदल्या करण्यात आल्या. तरीही राजासाठी एखादा पठ्ठा अडचणीचा ठरत होता. त्याचा काटा काढण्यासाठी त्याचा उद्योगच राजाने आपल्या धनवान मित्राला विकत घ्यायला लावला. आता सारं काही मोकळं मोकळं होतं.
खपून जातं म्हणून त्याने खोटेपणाची हद्द गाठली. विदेशात जाऊन तो आठवड्यात एक आयआयटी सुरू करू लागला होता. दोन दिवसाआड कॉलेज सुरू करण्याच्या बाता मारू लागला. दिवसाआड आयटीआय सुरू करण्याच्या हाका देऊ लागला. विदेशींना वाटलं राजा बलवान तसा देश बलवान. प्रजेची अडचण प्रजेलाच ठावूक. पिचलेली प्रजा डोक्यावर हात मारू लागली. दरबारी बोरुबहाद्दर मात्र खुशमस्करीत होते. राजा किती उदार, याचे धडे ते आंबे चोखत आणि सकाळच्या न्याहारीचे प्रश्न करत प्रजेला देत. दरबारी पायावर लोळण घेत होतेच. शिक्षणासाठी होणारे प्रजेचे हाल, रोजगारावाचून प्रजेची होणारी परवड, जाती जातीतल्या तेढीचं संकट राजा नजरेआड करत होता. इतकं होऊनही दरबारातल्या खुशमस्कर्यांनी राजाला चंदनाचा मुलामा देण्याची एकही संधी सोडली नाही. फुकटचे ढोल वाजवताना दरबारी मंत्री आपली जबाबदारीही विसरले.
सारं काही सुखनैव असताना मूट्यूब आणि वर्टल राजाला अडचणीचे ठरू लागले होते. त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राजाला शांती मिळणार नव्हती. त्याने फर्मान सोडलं. या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचे आदेश निघाले. यंत्रणांचा वापर करत या सगळ्यांना राजाला आपल्या पायाजवळ आणायचं होतं. द पायरवर घाला घातला. डीडीसीच्या कार्यालयावर छापे मारायला लावले. द पायर आणि डीडीसीच्या देशभरातल्या कार्यालयांमध्ये हाह:कार माजला. राजाला वाटलं डीडीसीचं जग हे आपल्या इलाख्यापुरतं मर्यादित असावं. पण सातासमुद्रा पलिकडे गेलेली अभू्र पाहून राजा वरमला. पायरचा माज उतरवला हा त्याचा समज खोटा ठरला. डीडीसीपुढे तर राजाला शरण जावं लागलं. तरीही राजा शहाणा होत नव्हता.
त्याच्या अंधळ्या दरबार्यांनी त्याला कोण बळ दिलं होतं. दरबारातले सल्लागार त्याला उसाच्या झाडावर चढवत होते. वणीपूरच्या संहारानंतरही त्याला सारं काही अलबेल वाटत होतं. दरबाराला हादरे बसतात असं दिसू लागताच त्याने ‘मिकलिक’च्या बोरुबहाद्दरांवर बंधनं टाकायला सुरुवात केली. जे काम करतात ते भरडलेच. पण जे पूर्वी करत होते त्यांनाही भरडवलं जात होतं. त्यांच्या घरावर, कार्यालयांवर सरदारांना धाडी घालायला लावल्या. त्यांचे बोरू ताब्यात घेतले. त्यांना नको नको ते प्रश्न करत सरदारांनी राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला.
राजाला आणि त्याच्या समर्थकांना वाटलं आता प्रश्न विचारणारा बोरुवाले घाबरतील, ते बोरू विकतील, अशी राजाची धारणा झाली. बोरुबहाद्दरांना कामाला लावल्याने राजाच्या दरबारी लेखकाना आकाश ठेंगणं झालं होतं. वरसेकर आणि वर्यवंशी कामाला लागले. राजा किती महान याचं गुणगाण करू लागले. परदेशी फंडाचा पर्दाफाश केला म्हणून राजाची पाठ थोपटत होते.
परदेशी फंडींगचा वापर करत आपल्याविरोधी कटकारस्थान रचलं जात असल्याचा आव राजाने आणला. ‘मिकलिक’वर आरोपांची एकच सरबत्ती सुरू झाली. ज्या परदेशी फंडिंगचं निमित्त यासाठी करण्यात आलं त्या परदेशी राजाने देशी राजासाठी फंडिंगच्या कितीतरी तिजोर्या याआधी रित्या केलेल्या प्रजेने पाहिल्या होत्या. मुलुखातल्या महामारीच्या काळात राजाने निर्माण केलेल्या खासगी कोषात परदेशी राजाचाही पैसा होता. देशी राजाला हा पैसा चालत असेल तर ‘मिकलिक’ने पैसे घेतले तर बिघडलं कुठे, असा प्रश्न प्रजा विचारू लागली.
राजाने लादलेल्या मोहर बंदीवर झोटीएमचा आणलेला पर्यायही परदेशी राजाच्या उद्योगातला होता. आपल्या सोयीसाठी राजाला परदेशी मुद्रा चालते. पण इतरांनी ती वापरली तर त्याच्यावर कारवाई करण्याचं राजाचं धोरण केवळ आपमतलबीच नव्हे तर ढोंगीही होतं. ज्या ‘कार्टअप’साठी राजाने सारी शक्ती पणाला लावली त्या कार्टअप’चा जनक परदेशीच होता, याचाही विचार राजाने केला नाही.
राजाचा परममित्र असलेल्या वादानीचा पार्टनरही परदेशी. राजाला ठरवेल ती देशसेवा आणि इतरांसाठी तो देशद्रोह. हा राजाचा अप्पलपोटेपणा होता. बोरुबहाद्दरांवरील कारवाईने राजाचा पोलखोल झाला. करायला गेलो एक झालं दुसरंच, असं राजाचं झालं. देशात कधीकाळी लावण्यात आलेल्या वाणिबाणी विरोधात गळे काढणार्या राज्याच्या दरबार्यांना ती वाणिबाणी किमान नियमानुसार होती, याचा विसर पडला. ठरवून आणलेल्या वाणिबाणीत बोरुबहाद्दरांची गळचेपी ठरलेलीच होती. पण जाहीर न झालेल्या वणिबाणीत सारंच काही अलबेल. तेव्हा भरतनगरीच्या राजाचं भलं होवो…



