महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालीकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही, त्यांना महायूती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण अशा रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन आ. थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी केली आहे.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करावी याचे आश्चर्य वाटते.
संगमनेर नगरपालीकेच्या अंतर्गत सुरू असलेले कॉटेज रुग्णालय हे शहर आणि तालुक्यातील जनतेकरीता मोठा आधार होते. परंतू स्वत:च्या बगलबच्च्यांची रूग्णालय चालावी, म्हणून ज्यांनी कॉटेज रुग्णालय बंद करण्यात धन्यता मानली, त्यांना स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेण्याचा तसेच सुंस्कृतपणाच्या आणि विकासाच्या गप्पा मारण्याचाही कोणाताही अधिकार नसल्याचा टोला जाहागिरदार यांनी लगावला.
कोव्हीड संकटात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक खासगी रुग्णालयांना कोव्हीड सेंटरची मान्यता कोणी दिली. राज्यात त्यावेळेस कोणाचे सरकार होते. हेदेखील तालुक्याने नव्हे तर जिल्हयानेही पाहीले आहे. सरकारी रुग्णालयात सुविधा नसल्याने सामान्य माणसाचे कसे हाल आणि अर्थिक लूट झाली हे सर्वश्रृत आहे. यासर्व परिस्थितीत मंत्री म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनी फक्त बैठका घेण्यात धन्यता मानली. सामान्य माणसाची अर्थिक लूट करणाऱ्या एकाही रुग्णालयावर कारवाई करण्याची हिंमत ज्यांनी दाखवली नाही, त्यांनी महायुती सरकारकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करावी, हे अतीशय हास्यास्पद असल्याचे जहागिरदार यांनी स्पष्ट केले.
गेली चाळीस वर्ष नगरपालीकेची आणि तालुक्याची सर्व सतास्थाने आ. थोरातांच्या ताब्यात आहे. परंतू एकही सरकारी रुग्णालय शहर आणी तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण उभारले न गेल्याने सामान्य माणसाची मोठी गैरसोय झाली असल्याकडे आ. थोरात सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जहागिरदार यांनी केला आहे.



