महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ‘संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज’ या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.
सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद सोहळा संपन्न झाला. या हायवेच्या निर्मितीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधातून 25 कोटी रुपये मिळविले त्यात महाविकास आघाडी सरकारकडून आणखी पैसे टाकण्यात आले. या दोन्ही निधीतून हॅपी हायवे झाला आहे. सुशोभीकरणासह पथदिवे, दुभाजक, पादचारी मार्ग, वृक्षारोपण यामुळे हा रस्ता मॉडेल रस्ता ठरला आहे.
या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात भर पावसात संपूर्ण संगमनेरकर, सर्व सेवाभावी संस्था मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. बालक, तरुण, नागरिक, महिला यांनी विविध उपक्रम घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला. भर पावसात संगमनेरकरांचा उत्सव व आनंद काही लोकांना पहावला नाही. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत अधिकाऱ्यांना दमदाटी करून हे पथदिवे बंद ठेवण्यासाठी षडयंत्र केले. तेच लोक आज पथदिवे सुरू करण्यासाठी निवेदन देत आहेत. ही फक्त प्रसिद्धीसाठी केविलवाणी स्टंटबाजी आहे.
या लोकांना संपूर्ण संगमनेरकर आणि संगमनेर तालुका ओळखून आहे. विविध निवडणुकांमधून यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. अनेक वेळा अनेकांचे डिपॉझिट जप्त केले आहे.
समाजासाठी कोणतेही काम नसणारे हे लोक विकास कामांमध्ये खोडा घालण्यासाठी पुढे असतात. पथदिवे सुरू करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्युत विभागाला सूचना दिली असून लवकरात लवकर हे पथ दिवे सुरू होऊन संगमनेरकरांच्या आनंदात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
जावेद जहागीरदार यांची पत्रकबाजी प्रसिद्धीसाठी
राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेमुळे नांदेड, नागपूर यांसह विविध शहरांमधून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली. आमदार थोरात हे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या मागणीवर जावेद जहागीरदार यांनी फक्त प्रसिद्धीसाठी पत्रकबाजी केली आहे. कोणतीही माहिती न घेता त्यांची पत्रकाची केविलवाणी आहे. कॉटेज हॉस्पिटल बंद नसून ते कार्यान्वित असून शहर आरोग्य केंद्र आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार थोरात यांचाच पाठपुरावा आहे. ज्यांना जनतेशी काही घेणेदेणे नाही. असे लोक प्रसिद्धीसाठी पत्रकबाजी करत असून इतके दिवस काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झालेले हे कोण आहे हे जनतेला माहीत आहे.भाजप हा पक्ष कायम मूळ प्रश्नांवर लक्ष विचलित करत आहे. – जावेद शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष.



