महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या स्वप्नातल्या दुनियेत वावरत असावेत. त्यांना भाजपच्या प्रचंड शक्तीचा इतका अहंकार जडला आहे की कोण जाणे. यामुळेच ते आता भाजप म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भाजप अशा समीकरणात जगत आहेत. भाजपची राज्य जबाबदारी त्यांच्याकडे आल्यापासून काय करू आणि काय नको, असं त्यांचं झालेलं दिसतं. त्यांना 2024 च्या निवडणुकीत भाजपला विजयी करायचं आहे, ते ही 48 पैकी 45 जागा घेऊन. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला जिंकून आणणं ही त्यांची जबाबदारीच आहे. पण 48 पैकी 45 जागा जिंकणार म्हणजे सहकार्यांच्या वाट्याला ते तीनच खासदार देणार आहेत. बाजार खुळ्यांचा का ते आता बावनकुळ्यांना कळायला हरकत नाही. आपण बोलतो काय आणि करतो काय, याचंही भान बावनकुळे यांना राहिलेलं दिसत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात सगळेच बुध्दू असल्यासारखं ते बरळत आहेत. नरेंद्र मोदी हे तिसर्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा ते करत आहेत. राजकारणात कोणी काय दावे करावेत, याला काही मर्यादा नाही. कोणीही कसलेही दावे, प्रतिदावे करू शकतो. ऐपत नसलेल्या कोणालाही अशी माणसं मुख्यमंत्री पदावर बसवू शकतात. बावनकुळे अशाच मानसिकतेत आहेत. आपला पक्ष मोठा असल्याने असे दावे करायचा अधिकार भाजपच्या प्रत्येकाला आहे. बावनकुळ्यांना असे दावे करण्याचा अधिकार हा जणू परंपरेनेच दिलेला आहे. आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यापासून त्यांना उमेदवारी नाकारणं आणि पत्नीला एबी फॉर्म न देण्याच्या कारस्थानाचे हेलकावे त्यांच्या या दाव्यांमध्ये सामावले आहेत. पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय कोणालाही पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाकडे किंमत नाही. यामुळे फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय आपलं अस्तित्व शुन्य आहे, हे बानकुळे जाणून आहेत. यामुळे फडणवीसांच्या ओंजळीने पाणी प्यायचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणं ही काही जादू नाही. विरोधी पक्षांहून कितीतरी पटीने रक्कमा जमवून जगातला पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या पक्षाचा पंतप्रधान होणं कधीही अशक्य नाही. ते पुन्हा पंतप्रधान होणं म्हणजे फडणवीस आणि बावनकुळे यांची स्थानं मजबुत, असा याचा अर्थ होय. मोदींच्या एकमेव आशीर्वादापायी फडणवीस यांनी केंद्रात अनेकांना अंगावर घेतलं आहे. मोदींच्या भोवती वावरणार्या इतर नेत्यांना फडणवीस हे मोदींचे उत्तराधिकारी असल्याचं वाटतं. यामुळे आपला पत्ता कापल्याचा भास या भोवतालच्यांना होत असतो.
अशा फडणवीसांचा हात धरून बावनकुळेंचं मार्गाक्रमण सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बावनकुळे यांना अनन्यसाधारण आलेलं महत्व ही फडणवीसांची देण असल्याने आपलं कोणीही वाकडं करणार नाही, याची खात्री त्यांना आहे. ते जे ठरवतील तेच महाराष्ट्रात घडेल असं बावनकुळे यांना वाटत असल्यास नवल नाही. अहंकार जडला की माणसाची वर्तणूक तशीच असते. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांना कोणत्या शब्दात मोजलं जातं याची गणती बावनकुळेंना ठावूक नाही असं नाही. सध्या राज्यात त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. आगामी सार्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय बावनकुळे यांनी मध्यंतरी जाहीररित्या बोलून दाखवला होता. ही घोषणा हवेत विरत नाही तोच त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपाचा फार्मूलाही निश्चित करून टाकला. यातूनच स्वपक्ष 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा मानस ते व्यक्त करताना दिसतात. आपल्या आधीच्या घोषणेचा विसर पाडण्यासाठी अशा घोषणा करायच्या असतात. भाजपसाठी या घोषणा म्हणजे सोबत असलेल्यांसाठी इशाराच असतो.
वर्षभरात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत निवडणूकपूर्व चाचणीचा अंदाज घेतला आणि या निवडणुकीत पक्षाला जबर फटका बसेल, असं अनुमान निघालं. हे अनुमान आल्यापासून पक्ष नेत्यांच्या पायाखालची वाळू सरली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांवर भाजपची विशेष मदार आहे. या सगळ्या राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळवणं भाजपसाठी मैलाचा दगड आहे. यामुळे ज्या राज्यात सत्ता आहे त्या राज्यांवर अधिक नजर ठेवण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. यात सत्ता असललं महाराष्ट्र आलंच.
या राज्यावर बावनकुळे यांच्याकरवी लक्ष ठेवण्याचा प्रयत्न त्या पक्षाने चालवला आहे. राज्यातील वातावरण भाजपला मारक असल्याने कोणत्याही स्थितीत अधिकच्या जागा मिळाव्यात असा प्रयत्न भाजप करणार हे उघड आहे. यासाठी त्या पक्षाने सुरुवातीला एकनाथ शिंदेंकरवी राज्यात सत्ता मिळवली. तेव्हा उध्दव ठाकरे यांच्याविषयी विखारी प्रचार करण्यात आला. सत्ता आली. पण या सत्तेतूनही जागांचं गणित जमणार नाही, हे लक्षात आल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला सत्तेत सामावून घेण्यात आलं. यावेळी शरद पवारांविषयी खोटारडा प्रचार केला गेला. सत्तेला इतका मोठा पाठिंबा मिळाला असताना लोकसभेच्या अधिकच्या जागा जिंकणं त्या पक्षाला अशक्य नव्हतं. मात्र असली सत्ता आपल्यावरच बुंमरँग होत असल्याचं लक्षात आल्यावर नेत्यांची बोलती बंद झाली. शरद पवारांनाही पक्षात आणा अशी अट घालण्यात आली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची दोन शकलं पाडूनही राज्यात बहुमत मिळवणं भाजपला शक्य नाही, हे लक्षात आल्यावर खोटं बोलून, लोकांना आश्वासनांची गाजरं दाखवून, विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मतदारांच्या दारावर धडकण्याचा संकल्प बावनकुळ्यांना हाती घ्यावा लागला आहे. बावनकुळ्यांना मिळत असलेल्या ‘प्रचंड’ प्रतिसादाने पक्ष हुरळून गेला. यातूनच पक्षाला 45 जागा मिळतील असा आशावाद बावनकुळे व्यक्त करत आहेत.
बावनकुळेंच्या या अपेक्षा म्हणजे महायुती सरकारमधील सहकारी पक्षांना वाटेला लावण्याचा कार्यक्रम दिसतो आहे. लोकसभेच्या 22 जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत, अशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकीकडे मागणी केली असतानाच 45 जागांची अपेक्षा भाजप ठेवत असेल तर याचा अर्थ इतरांनी काय काढायचा? या दोन पक्षांमधील जागांच्या दाव्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय द्यायचं, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. असे अनुत्तरीत प्रश्न प्रलंबित ठेवून स्वत:चं इप्सित साध्य करण्याची भाजपची खोड जुनीच आहे.
2019 च्या निवडणुकीत युतीद्वारे निवडणुका लढवताना शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधी आपल्यातल्याच अपक्षांना झुंजवायला लावत भाजपने सेनेच्या 22 जणांचा पराभव करायला लावला होता. हा अनुभव एकनाथ शिंदे यांच्या गाठीला असल्यानेच 48 पैकी 22 जागा मिळाल्या पाहिजेत, असा हेका त्यांच्या शिवसेनेने धरला असावा. महादेव जानकर, बच्चू कडू, दिवंगत विनायक मेटे यांच्या पक्षांचं भाजपने काय केलं याचा अनुभव पुरता बोलका आहेच.
जागा वाटपाचा तिढा स्पष्ट दिसत असताना स्वत:चं महत्व वाढवण्याचा प्रयत्न बावनकुळे यांच्याकरवी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. तो किती यश देईल, हे काळच ठरवेल. पण या घडीला जितकं म्हणून खोटारडेपणा करता येईल, तितका तो केला जाईल आणि मतदारांना पुन्हा एकदा झुलवलं जाईल, यात शंका नाही. बावनकुळे यात माहीर आहेत.
त्यांनी मध्यंतरी पत्रकारांना ढाब्यावर नेण्याचं फर्मान कार्यकर्त्यांना काढलं होतं. 45 जागा जिंकण्याची हिंमत असेल तर असले ढाब्यावरचे उद्योग करायची बावनकुळे यांना आवश्यकता काय? तेव्हा उगाच गमजा मारून मतदारांना वेड्यात काढणं भाजपने सोडलं पाहिजे. मात्र त्यांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचा असल्याने त्यात सारं रिचवण्याचा प्रयत्न लीलया सुरू आहे.



