महाराष्ट्र संवाद न्यूज
गणेशनगर : दुष्काळामुळे उसाचा तुटवडा आहे, गणेश बंद व्हावा यासाठी टोकाचे प्रयत्न सुरू आहे मात्र तरीही परमेश्वराच्या आशीर्वादाने धुराडे पेटले आहे, इतर कारखान्यांच्या बरोबरीने योग्य भाव ऊसाला दिला जाईल, सभासदांची दिवाळी गोड व्हावी या भूमिकेतून सर्व सभासदांना दहा किलो साखर मोफत दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैय्या कोल्हे उपस्थित होते. श्री गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते, ज्येष्ठ नेते एकनाथ गोंदकर, प्रभाताई घोगरे, सुधीर म्हस्के, शिवाजी लहारे, गंगाधर चौधरी आदींसह पदाधिकारी संचालक आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. एकनाथ गोंदकर व सौ शोभाताई, अनिल टिळेकर व सौ सुनीताताई, नानासाहेब नळे व सौ सुनीताताई, आलेशराव कापसे व सौ कमलताई, संपतराव चौधरी व सौ मंगलताई या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गणेशचा बॉयलर पेटवला गेला.
थोरात म्हणाले, बॉयलर होऊच नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न झाले, मोठी अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. आचारसंहिता असताना बेकायदेशीररित्या करार केला गेला. आता त्या कराराची भोकाडी दाखवून गणेश कारखान्याला कुठूनही आर्थिक मदत मिळू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा बँकेने मंजूर केलेले कर्ज नाकारले. गाळप परवान्यासाठी अर्ज केला, त्यामध्ये देखील या कराराची आडकाठी आणली गेली. विश्वास बसणार नाही, मात्र प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याकडून 81 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा आकडा रोज वाढतो आहे. आपण अंतर्गत लेखापरीक्षण केलं, त्यांनीच नियुक्त केलेल्या शासकीय लेखापरीक्षकाकडूनही लेखापरीक्षण करून घेतलं, हा आकडा कोठेही जुळायला तयार नाही. हे 81 कोटी नेमके आले कुठून?‘
‘गणेश परिसरामध्ये ऊस उत्पादकांवर वेगळ्या प्रकारची दहशत सुरू झाली आहे, उसाची नोंद आमच्याकडे करा अन्यथा कर्ज मिळणार नाही, गणेशला ऊस घातला तर रस्त्याचे आणि बांधाचे प्रश्न तयार होतील, असे इशारे सभासदांना काही मंडळी देत आहेत. सभासदांचे कौतुक करावे वाटते की त्यांनी यातल्या कोणत्याही धमकीला भिक घातलेली नाही. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही प्रयोग झाले, मात्र ते कर्मचारी सुद्धा कारखान्यासोबत निष्ठेने उभे आहेत. ‘गेले सात-आठ वर्ष या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता होती, ऊस होता, अशा काळात खरे तर चांगले गाळप व्हायला पाहिजे होते, ते गाळप का झाले नाही? आम्ही तर अडचणीच्या काळात आलोय. नैसर्गिक संकटांच्या जोडीने, राजकीय संकटे पण आहेत आणि तरीही आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी पुढाकार घेतोय आणि परमेश्वराच्या कृपेने त्यात आतापर्यंत आम्हाला यश मिळाले आहे. याचा अर्थ त्यांचा हेतूच चांगला नव्हता, आठ वर्षात त्यांना ही संस्था चालवायची नव्हती, बंद पाडायची होती, हडप करायची होती, असाही आरोप थोरात यांनी केला.
विवेक कोल्हे म्हणाले, ‘अनेकांना प्रश्न होता, बॉयलर होईल का नाही? ज्यांच्या मनात शंका होती, त्यांना आज उत्तरे मिळाली. आज धुराडे पेटले, मला खात्री आहे या परिसराची दिवाळीसुद्धा गोड होईल. आमच्यासमोर अनेक अडचणी आहेत. काही नैसर्गिक तर काही कृत्रिम आहेत. कारखान्याला त्रास कसा होईल यासाठी टोकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र आम्हाला वाईट प्रवृत्तीचा नाश करून, उजेडाकडे ही संस्था घेऊन जायचे आहे. मागील संचालक मंडळाने मोठ्या रकमा थकाविल्या आहेत, अनेक शासकीय विभागांच्या नोटीसा आपल्याला प्राप्त झाल्या आहे, मात्र नूतन संचालक मंडळ त्यावरही यशस्वी मार्ग काढत आहे. ऊस दराच्या स्पर्धेत गणेश कारखाना मागे राहणार नाही, इतर कारखान्यांच्या जोडीने चांगला भाव आम्हीही देणार आहोत.
‘जायकवाडीला पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न गंभीर पातळीवर गेला आहे, नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे, अशा काळात हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आणि ही लढाई लढण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारावा लागणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही करावे लागेल. आपण संघर्ष केल्याशिवाय, आवाज बुलंद केल्याशिवाय आपली व्यथा ऐकून घेतली जाणार नाही.‘
गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी प्रास्ताविक केले तर संचालक अनिल गाढवे यांनी आभार मानले.
उद्घाटन कोणीही करो, जीवन सार्थक झाले
निळवंडे धरण आणि कालव्यांचे उद्घाटन कोण करते हा प्रश्न दुय्यम आहे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होणे, हा महत्त्वाचा भाग आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळाले, माझे आजवरचे प्रयत्न फळाला आले आणि माझे जीवन सार्थकी लागले असे मी समजतो. – आ. बाळासाहेब थोरात.
राजकीय संकटांचाही सामना करू!
गणेश कारखान्यावर काही आसमानी तर काही राजकीय संकटे आलेली आहे. सभासद आणि शेतकऱ्यांचा आशीर्वादामुळे या संकटातून आम्ही बाहेर पडू, आमची भूमिका गणेश कारखाना वाचविण्याची आहे, सभासदांनी गणेशच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. – विवेक कोल्हे, चेअरमन, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना



