गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा
जिल्ह्यात रखडलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, सर्वाधिक २९ प्रलंबित प्रकरणांसह ५८ लाख रुपयांचा निधी पारनेर तालुक्यात अडकला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात २४ प्रकरणांचे ४८ लाख रुपये रखडले आहेत.


मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ३९० प्रस्ताव दाखल झाले होते. यामध्ये शेतीकामा दरम्यान झालेले अपघात, वीज पडणे, सर्पदंश, पूर आणि रस्ते अपघात अशा विविध कारणांमुळे झालेल्या ३८४ मृत्यूंच्या आणि ६ अपंगत्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. या प्रस्तावांची छाननी करून प्रशासनाने ३५० प्रस्तावांना मंजुरी दिली.
शासन स्तरावर या योजनेचे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाइन करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी आणि मंजुरी डिजिटल पद्धतीने झाल्यामुळे प्रकरणांचा निपटारा जलद होईल, असा दावा केला जात होता. परंतु, मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी अनुदानाचे वितरण मात्र अजूनही ऑफलाइन पद्धतीनेच केले जात असल्याने निधी वाटपात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ऐन अडचणीच्या काळात हक्काची मदत वेळेवर मिळत नसल्याने, अपघातानंतर उत्पन्नाचे साधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इतर तालुक्यांचा विचार केल्यास अहिल्यानगर तालुक्यात १३ प्रकरणांचे २६ लाख, कर्जतमध्ये १३ प्रकरणांचे २६ लाख, राहुरीमध्ये ११ प्रकरणांचे २० लाख, कोपरगावमध्ये ११ प्रकरणांचे २२ लाख आणि राहाता तालुक्यात ११ प्रकरणांचे २२ लाख रुपये प्रलंबित आहेत.
