संगमनेर, प्रतिनिधी-
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून हा तालुका आता दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळात पंजाबप्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘मिशन ५० लिटर’ क्षमतेच्या गाईंच्या निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहेत. तर पशुपालकांनी आगामी काळात ‘कमी गाई जास्त दूध’ हे सूत्र वापरावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सोमवारी वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत तालुक्यातील १५०० युवक दूध उत्पादक सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, पंजाब पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ. समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भास्करराव सिनारे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, विक्रम राजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कुऱ्हाडे, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ. प्रमोद पावसे, भारत मुंगसे, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, विनोद हासे यांच्यासह विविध पशुवैद्यकीय अधिकारी आणि तालुक्यातील युवक व महिला दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दलजीतसिंग गिल म्हणाले की, पंजाब राज्य कृषी व दूध उत्पादनात देशात अग्रेसर असून तेथील संशोधन संपूर्ण देशात जात आहे. रणजीतसिंह देशमुख हे २००९ पासून पंजाबमधील दूध उत्पादकांच्या संपर्कात असून त्या माध्यमातून एमडीएफ गोठा व मुरघास या संकल्पना महाराष्ट्रात राबवल्या गेल्या आहेत. संगमनेरमधून सुरू झालेले ५० लिटर दूध निर्मितीचे मिशन महाराष्ट्रासाठी एक नवा पॅटर्न ठरेल. या कार्यात पंजाबचे शेतकरी सर्वतोपरी मदत करतील, असे सांगतानाच पंजाबी आणि मराठा बांधवांनी एकत्र लढून कायम देशहिताचे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, १९७८ मध्ये पंजाबमधून गाई आणून तालुक्यात दूध उत्पादन सुरू झाले. दूध संघाच्या माध्यमातून या भागाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून रणजीतसिंह देशमुख यांनी मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. कोरोना काळातही त्यांच्या पुढाकारातून दररोज १० लाख लिटर दुधाची पावडर सरकारने बनवली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा दूध पुरवठा एकही दिवस बंद झाला नाही. आता आपल्याला गोठ्याची स्वच्छता, गाईंचे प्रजनन आणि आरोग्य व्यवस्थापन यावर भर देऊन स्वच्छ व निर्भेळ दूध निर्माण करावे लागेल. सहकारामुळे खाजगी दूध संघांनाही चांगला भाव द्यावा लागतो, त्यामुळे सहकार टिकला पाहिजे असेही ते म्हणाले.
रणजीतसिंह देशमुख यांनी तांत्रिक माहिती देताना सांगितले की, मिशन ५० लिटर अंतर्गत आपल्याला ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करायच्या आहेत. यासाठी पंजाबमधून ११ महिन्यांच्या कालवडी आणून त्यांच्यावर आयात केलेले सॉर्टेड सिमेन वापरणे किंवा आपल्याच गोठ्यात पंजाबसारख्या उच्च दर्जाच्या गाई तयार करणे हे पर्याय उपलब्ध आहेत. सात वर्षांच्या कालावधीत तिसऱ्या पिढीपर्यंत अशा गाई निर्माण करणे शक्य आहे. यासाठी चारा, गोठा आणि प्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे असून गाईंना बसण्यासाठी मऊ जागा असणे गरजेचे आहे. दूध उत्पादकांनी आता ‘दूध उद्योजक’ बनावे आणि राजहंस या विश्वासाच्या ब्रँडच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात पंजाबमधील ५० लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई प्रत्यक्ष व्यासपीठावर आणून महाराष्ट्रातील गाईंमधील फरक उपस्थितांना दाखवण्यात आला. तसेच ‘मिशन ५० लिटर’ प्रभावीपणे राबवण्यासाठी पंजाब व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रणजीतसिंह देशमुख व दलजीतसिंग गिल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. कोमल मस्के यांनी केले तर आभार डॉ. प्रमोद पावसे यांनी मानले.
राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन
पशुपालकांनी आगामी काळात 'कमी गाई जास्त दूध' हे सूत्र वापरावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे






