महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. भाजप कडून ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्याच्या राजकारणात कधी कोणती उलथापालट होईल याची कोणतीही शक्यता राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा आता तोंडाशी आलेला सत्तेचा घास महाविकास आघाडीने हिरावून घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी एकत्र येत अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. या सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाल होत नाही तोच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील एक मोठा गट फोडून शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर भाजपकडून बसविण्यात आले.
शिवसेनेतील फुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्यात आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसविण्यात भाजप यशस्वी झाली. दोन मोठ्या पक्षात फूट पाडल्यानंतर मोठ्या बहुमतात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आहे. मात्र राज्यातील हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अपात्रतेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असताना आता भाजपकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर फडणवीस यांच्या वक्तव्याचा मी पुन्हा येईल हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे दसरा मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. दिल्ली आणि शिर्डी दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडल्या की ज्यामुळे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र त्यानंतर भाजपने हे ट्विट आपल्या ट्विटर हँडलवरून हटविले आहे.



