स्मशानभूमीसाठी पालकमंत्र्यांकडे मी निधी मागितला
निकृष्ट काम मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भागीदारीत!
निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : संगमनेरमध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला अमोल खताळ विरोध करत आहे. त्यांचे काम चांगले सुरू असल्यामुळे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आमच्या गावातील लोकांना हाताशी धरून आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस वाल्मीक शिंदे यांनी केला आहे.
संगमनेर तालुक्याच्या विकासात योगदान नसलेले व चिकणी गावाशी कोणताही संबंध नसताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक अमोल खताळ यांच्या विरोधात चिकणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेधाचा ठराव केला. यासंदर्भात पोलीस यंत्रणेला निवेदन देत सत्तेचा गैरवापर करून केली जाणारी दमदाटी सहन केली जाणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांसह काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे की, खताळ यांच्या धडाकेबाज कामगिरीने धास्तावलेल्याना त्यांची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार नाही. चिकणी गावातील विकास कामांसाठी नामदार विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून मी निधी मागितला होता त्यानुसार स्मशाभूमी सुशोभीकरणसाठी निधी येऊन त्यांचे काम गावातील काँग्रेस कार्यकर्ता व काही ग्रामपंचायत सदस्य भागीदारीमध्ये करत होते. ते काम निकृष्ट सुरू असल्यामुळे मी ठेकेदार दर्शन वर्पे यास जाब विचारला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
त्यामुळे व्यथित झाल्याने मी भारतीय जनता पार्टीचे अमोल खताळ पाटील यांच्याकडे तक्रार करून गावातील काही काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला धमकी देत आहे असे सांगितले. खताळ यांनी ०३ ऑक्टोंबर रोजी याबाबत पंचायत समिती उपअभियंता नाना अहिरे यांना फोन करून व मेसेजद्वारे तक्रार दिली. परंतु त्यांनी काँगेस नेत्यांच्या दबावामुळे दुर्लक्ष करून कामाची पाहणी केली नाही. त्यामुळे खताळ यांना माझ्यासह गावातील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंती वरून ते ०९ ऑक्टोंबरला कामाची पाहणी करण्यासाठी आले. या पाहणी वेळेस चिकणी गावातील वाल्मीक शिंदे, मुचकुंद वर्पे, रवींद्र भिकाजी वर्पे, राजेंद्र चांगदेव वर्पे, शिवाजी किसन वर्पे, जगन्नाथ घुले, शशिकांत वाघमारे, वैजनाथ वर्पे, कांताराम वर्पे, ग्रामपंचायत सदस्य संदीप रामचंद्र वर्पे, गोरक्ष वर्पे, सुरेश माळी, विजय वर्पे,अशोक वर्पे यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी स्थानिक काँग्रेसच्या लोकांनी उपसरपंच यांच्या सहीने सदर काम सुरू असून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, असे सांगितले तपासणीमध्ये ते सिद्ध झाले. त्यावेळेस ग्रामसेवक यांनी सुद्धा मान्य केले सदर काम अतिशय निकृष्ट झालेले असून आम्ही बिल काढणार नाही. या कामावरूनच खताळ यांनी बिडीओ अनिल नागणे, उपअभियंता अहिरे यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता त्यांनी सुद्धा कामाचे बिल काढणार नाही. जे निकृष्ट काम झालेले असेल ते पुन्हा ठेकेदाराकडून करून घेतले जाईल असे सांगितले.
खताळ व गावकऱ्यांनी केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामधे कुठेही तोडफोड झालेली नसून त्यांनतर आता जर काही नुकसान झाले असेल तर त्याला जबाबदार स्थानिक काँग्रेस नेते व ठेकेदार असू शकतो. गावात सत्तेचा गैरवापर नेमके कोण करत आहे हे लोकांना माहीत आहे.
निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते. संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जसास तसे उत्तर दिले जाईल असा निर्धार खताळ यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा ओघ वाढला असल्याने काही लोक दुःखी आहे. तालुक्याचा इतिहास माहीत नसणाऱ्यानी टीका करताना भान ठेवावे. यापूर्वी साखर कारखाना, बाजार समिती, शेतकी संघ व इतर सहकारी संस्था याचे संस्थापक कोण आहे ?
संगमनेरमधील ४० वर्षापासून सुरू असलेल्या एकहाती सत्तेला, दहशतीला, बगलबच्चे यांच्या दादागिरीला, वाळू तस्कर, गौण खनिज तस्कर, निकृष्ट काम करणारे ठेकेदार तसेच बगलबच्चे यांचे सुरू असलेले अवैध धंदे बंद झाल्यामुळे व्यथित झालेले सुसंस्कृत लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्चे यांनी खताळ यांचा राजकीय धसका घेतला असल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण जनता सुज्ञ झाली आहे.
खताळ पाटील हे ग्रामीण भागातील काँग्रेस कालावधीतील राजकीय द्वेषातून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सोडवत असल्यामुळे भावी मुख्यमंत्री व्यथित झाले असून खताळ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी संगमनेरमध्ये असलेली हिटलरशाही, दादागिरीच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी, लोकांना दिला गेलेला त्रास, घराघरात लावली गेलेली भांडणे, निधी केंद्र व राज्य सरकारचा पण उद्घाटने सुसंस्कृत नेते करतात, याला खताळ यांनी नामदार विखे यांच्या माध्यमातून विरोध सुरू केल्यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य आले आहे याचे दुःख काहीना झालेले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयातून प्रेस नोट खताळ यांच्या विरोधात दिली जाते याचा अर्थ खताळ यांचे काम जोरात सुरू झाले आहे, असे शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.



