महाराष्ट्र संवाद न्यूज
राहाता : राहाता विधानसभा मतदारसंघात दहशतीचे झाकण उडाले आहे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे या जोडीने शेतकरी सभासद आणि कामगारांच्या हिताची भूमिका घेतली असून आजवर राहाता तालुक्यातील जनतेला गृहीत धरणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच आधी आमच्या बहिणींचे देवदर्शन आणि आता रेशन कार्ड धारकांना पाच किलो साखर हे निर्णय झालेले आहेत. थोरात-कोल्हे जोडीचा पायगुण चांगला असून त्यांच्यामुळेच जनतेची दिवाळी गोड होणार आहे, असे मत ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी व्यक्त केले.
डॉ. गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकतेच गणेश सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी संयुक्तरीत्या सभासदांना प्रत्येकी दहा किलो साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला. सभासदांची दिवाळी गोड व्हावी ही त्या मागची भावना होती, मात्र या निर्णयामुळे तालुक्यातील नेतृत्व हादरून गेले.
आज स्थानिक नेतृत्वाने तालुक्यातील प्रत्येक रेशन कार्ड धारकाला पाच किलो साखर देण्याचा निर्णय घेतला. प्रवरा कारखान्याला भावही चांगला देऊ असा शब्द दिला. आम्हाला याचा आनंद आहे, मात्र हे सहज-सहज झालेले परिवर्तन नाही. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे या जोडीमुळेच हे शक्य झाले.
थोरात यांनी बाजार समितीपासून राहता तालुक्यात लक्ष घालायला सुरुवात केली. गणेश कारखान्यात परिवर्तन झाले. वर्षानुवर्ष दहशतीच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना भानावर आणण्याचे काम या निवडणुकीने केले. दहशत आणि दादागिरीची भाषा बदलायला लागली, निदान सार्वजनिकरित्या तरी कार्यकर्त्यांना विचारले जाऊ लागले. राहता तालुक्यातील आमच्या अनेक भगिनींना देवदर्शन घेता आले. निव्वळ एका परिवर्तनाने हा बदल झाला होता. देवदर्शन करणाऱ्या भगिनी सुद्धा देवासमोर जाऊन थोरात आणि कोल्हे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होत्या. आज त्यांची वागणूक बदलली, ऊसाला सत्तावीसशे रुपये भाव मिळाला, देवदर्शन झाले, आता जनतेला साखरही मिळणार आहे. एका परिवर्तनामुळे इतके बदल होत आहेत. राहाता तालुक्यातील जनतेच्यावतीने थोरात-कोल्हे जोडीचे आभार.
एका परिवर्तनामुळे इतके बदल घडत असतील, विधानसभेत जनतेने परिवर्तन केले तर दररोज दिवाळी साजरी करता येईल. — डॉ. एकनाथ गोंदकर



