राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, दूध संघाने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. राजहंस दूध संघ हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जात असून दीपावली निमित्त दूध संघाने 32 कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक, कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. वसुबारस निमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे. तालुक्यात पशुधन मोठे असून दररोज सुमारे सात लाख लिटर दूध निर्माण होत आहे. मोठ्या कष्टातून उभ्या असलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले…
भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दूध संघाच्यावतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला.





