महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राज्यभरातील 15 हजार सरकारी शाळा बंद करून 65 हजारापेक्षा जास्त सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे शिक्षण बंद होणार असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा यासाठी संगमनेर छात्र भारतीने राज्य सरकारसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे.
शुक्रवारी हा आकाश कंदील टपाल खात्यामार्फत पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शाळा बंदी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून सरकारी शाळा बंद झाल्या तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे. शाळा बंद होणे म्हणजे मोफत मिळणारे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे.
त्यामुळे या निर्णयाविरोधात छात्र भारतीने आपला निषेध नोंदविला असून दिवाळी सारख्या प्रकाशमय उत्सवात सरकारला काळा आकाश कंदील पाठवून राज्य सरकार व शिक्षणमंत्री यांचा निषेध केला आहे.
राज्य सरकारला काळा आकाश कंदील भेट पाठविताना टपाल ऑफिसमध्ये छात्र भारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, सहसंघटक गणेश जोंधळे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, राम आरगडे, वैष्णवी भोईर, ओंकार अभंग, ईश्वरी गुंजाळ आदी छात्र भारतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.





