महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. या कामासाठी योगदान दिले. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनावेळी योगदान देणारे दूरच मात्र प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता. ही बाब चांगली नाही. मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत असून यापुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी काम केले जाणार आहे. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
वडगाव पान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जल पूजन कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले संगमनेर तालुका हा संघर्षातून समृद्धी निर्माण करणार आहे. 1999 पासून आपण निळवंडेच्या कामाला सुरुवात केली. दररोज सातत्याने या कामाचा आढावा घेतला. आदर्शवत पुनर्वसन केले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या. धरण आणि कालव्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक टप्प्यावर निधी मिळविला.

कोरोनासारख्या मोठ्या संकटात हे काम सुरू ठेवले होते. या कामात जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची मोठी मदत झाली, हे आपण वेळोवेळी जाहीरपणे सांगितले आहे.
उन्हाळ्यामध्ये निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी साठा होता. खरंतर त्यावेळी दुष्काळी गावातील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र काहींनी श्रेयासाठी हे पाणी थांबविले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी या धरणाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या कोणालाही बोलावले गेले नाही. माजी मंत्री मधुकरराव पिचड, अकोले चे विद्यमान आमदार यांना देखील बोलावले नाही. एक प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही बोलविला नाही. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते आणि ज्यांचे काहीच योगदान नाही ते मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे जनतेला ज्ञात आहे.
आता डाव्या कालव्यातून पाणी सुरू असून फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. अशी दडपशाही आणि दहशतीचे राजकारण संगमनेर तालुक्यात खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही इकडे येतात ते तालुक्यातील विकास कामे थांबविण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी. आम्ही राहता तालुक्यात जातो ते चांगले निर्माण करण्यासाठी. 35 वर्ष आपल्या घरातही या भागाची खासदारकी होती यातून संगमनेरसाठी आपण नेमके काय केले हा मोठा प्रश्न आहे.
आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. चांगल्या वाईट दिवसातही एकनिष्ठ आहोत, काही लोक मात्र संधीसाधूप्रमाणे उड्या मारतात. हे जनतेला मान्य नाही. इडीच्या भीतीने तिकडे गेले की ते मोकळे राहतात. अत्यंत कमी पाऊस झालेला असताना देखील सत्ताधारी आमदारांच्याच तालुक्यात दुष्काळी तालुके जाहीर केले. इतर तालुक्यात का नाही, असे देखील थोरात म्हणाले.



