संगमनेर, प्रतिनिधी –
संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्राध्यापक प्रकाश वाघमारे लिखित आणि संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे यांच्या मुख्य भूमिकेने सजलेल्या या महानाट्याने संपूर्ण राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या नाटकातून केवळ इतिहासच नव्हे, तर वर्तमान काळातील सामाजिक स्थितीवरही भाष्य करण्यात आले आहे. विशेषतः भ्रष्टाचार, महिलांची असुरक्षितता, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि जातीयवाद यांसारख्या ज्वलंत विषयांवर या प्रयोगातून प्रकाश टाकला जाणार आहे.
महानाट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि बाल शिवबा यांचे प्रेरणादायी प्रसंग, मोगलांशी झालेले रोमांचक संघर्ष, मर्दानी खेळ आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य राज्याभिषेक सोहळा. यासोबतच फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.
हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि इतिहासाची ही गौरवगाथा अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन
महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि इतिहासाची ही गौरवगाथा अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे





