महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
समाजातील विविध स्तरावर कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे आता अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, यामुळे अनेकांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे अनुभवाचे रूपांतर शैक्षणिक पात्रतेत होऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून या प्रक्रियेला गती देण्यासाठी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात एका विशेष प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीचे आयोजन जयहिंद लोकचळवळचे समन्वयक उबेद शेख, सुनिता कांदळकर आणि अंजुम बागवान यांनी केले होते. या बैठकीला जयहिंद लोकचळवळचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह पूर्व शिक्षण मान्यता केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश देशमुख आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रशासकीय संयोजक अतिक शेख, नगरसेवक डॉ. दानीश शेख, ज्ञानेश्वर नाईक, फैजान तांबोळी, मोहसीन शेख आणि आवेज खान या मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली.
अनेकांकडे उपजत कौशल्य असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना औपचारिक शिक्षण पूर्ण करता येत नाही. असे अनेक तरुण-तरुणी इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन तसेच विणकाम, शिवणकाम आणि टेलरिंग यांसारख्या विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांत अत्यंत निपुणतेने काम करत असतात.
मात्र, हाताशी अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांमधील नोकरीच्या संधी किंवा शासकीय लाभ मिळवताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर जयहिंद लोकचळवळ आणि मुक्त विद्यापीठाने उचललेले हे पाऊल अशा कुशल नागरिकांना त्यांच्या कामाची अधिकृत ओळख मिळवून देणार आहे.
या प्रमाणपत्रामुळे संबंधित नागरिकांना केवळ रोजगारच नव्हे, तर समाजात एक वेगळा सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही डॉ. तांबे यांनी यावेळी नमूद केले.
जयहिंद लोकचळवळचे मासिक…
जयहिंद लोकचळवळच्या सामाजिक कार्याचा विस्तार आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राज्यभर पसरत असून, संस्थेचे अधिकृत मासिक आता महाराष्ट्रभरात पोहोचत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीशी जोडून घ्यावे आणि माहितीसाठी ८७९३५६२६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संगमनेर आणि परिसरातील अनेक हातांना आता शैक्षणिक मान्यतेसह सन्मानाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.






