
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोर्चा काढला. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना वीज मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अपुरा दाब यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रोटेशन कालावधीत ११ तास वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी भर उन्हात सुमारे चार तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, शरद कोकणे, मारुती कवडे, सतीश खताळ, शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, सरपंच लताताई खताळ, सरपंच नवनाथ कातोरे, अरुण गुंजाळ, राहुल कवडे, ज्ञानेश्वर गोरडे, संदीप ठोंबरे, बाळासाहेब खताळ, सोमनाथ शिंदे, अमोल शिंदे, सचिन खताळ, बाळासाहेब गुंजाळ, अरुण गुंजाळ, मंगेश मतकर, वैभव डोंगरे, संतोष कोकणे, नितीन डोंगरे, किशोर खताळ, प्रभू खताळ, त्रिंबक खताळ, देवराम गुंजाळ आणि भाऊसाहेब शिरतार यांच्यासह धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, सांगवी, नांदुरी दुमाला, निमज व मिर्झापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेती आणि पशुधनासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत होती, मात्र आता परिस्थिती बिकट झाली आहे. अकोलेवरून येणाऱ्या ३३ केव्ही धांदरफळ फिडरचा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून, तो तातडीने सुधारण्याची गरज आहे. तसेच जुने झालेले वीज खांब आणि तारांचे व्यवस्थापन करणे, नदीकाठच्या बंद डीपी सुरू करणे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जर ११ तास वीज मिळाली नाही, तर आगामी काळात गुराढोरांसह अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार आणि इतर मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनाची दखल घेत वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण, मेखे आणि शिलावंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी येत्या एक-दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आणि रोटेशन काळात ११ तास वीज देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. भर उन्हात तरुण आणि वृद्ध शेतकऱ्यांची झालेली ही विक्रमी उपस्थिती संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.






