महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
गत खरीप हंगामामधील पीकविमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातही या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, महसूल व कृषी विभाग प्रशासनाने अंतिम पीक कापणी अहवाल तयार करताना प्रत्यक्ष शेतात न जाता, केवळ टेबलावर बसून हलगर्जीपणे पंचनामे केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा जास्त दाखविले गेले. जर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले असते, तर नुकसानीची खरी आकडेवारी आणि मागील ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी उंबरठा उत्पादन झाल्याचे स्पष्ट झाले असते. अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये उंबरठा उत्पादन कमी नोंदवले गेले असताना, केवळ संगमनेर तालुक्यात ते जास्त दाखविल्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत.
या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटना अहिल्यानगरच्या वतीने ११ मे रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुधाकर बोराळे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. या निवेदनाद्वारे शासनाला २९ मे पर्यंत पीकविमा भरपाई देण्याची मुदत देण्यात आली असून, तसे न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे, जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, बाळासाहेब घोगरे, सोमेश्वर साबळे, गणपत फटांगरे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.






