महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेरच्या तुरुंगातून पळून जाणाऱ्या चौघांना पकडण्यात अहमदनगर एलसीबीचे पोलीस यशस्वी ठरले. या चौघांसोबत त्यांचे दोन साथीदारे पोलिसांनी पकडले आता मात्र चौघांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींना संगमनेर न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांनी बुधवारी पहाटे संगमनेरच्या तुरुंगातून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या चौघांचा त्यांना मदत करणाऱ्या दोघा जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेरजवळ पकडण्यात आले. मदत करणाऱ्या दोघांमध्ये एक जण संगमनेरचा व एक पुण्याचा असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून आरोपी पलायन प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आयपीसी 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिराने यामध्ये ३०७ व १२० ब या कलमांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
आरोपींनी तुरुंगाचे गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेडचा वापर केला होता. साधारण एक महिना आरोपी हे गज कापत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून तुरुंगाचे तीन गज कापण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींना तुरुंगामध्ये व्हेक्सा ब्लेड कोणी पुरविले, आरोपींना भत्ता पुरविणारा सोडला तर या कुख्यात आरोपींपर्यंत सहसा कोणी पोहोचू शकत नसल्याने यामध्ये कोणी पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी किंवा अन्य कोणी सहभागी आहे का याचा देखील शोध सुरू आहे. पकडलेल्या आरोपीकडून याचा देखील उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरोपींनी तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून सोडणारा कारचालक पुन्हा गाडी घेऊन परतत असताना त्याला पोलिसांच्या पथकाने पकडले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता सदर आरोपी धुळे तालुक्यात असल्याचे त्यांनी सांगितले आणि तेथून ते नेपाळला जाणार आहेत अशी माहिती दिली.
पळून गेलेले आरोपी आणि त्यांना मदत करणारा संगमनेर येथील अल्ताफ असिफ शेख (रा. कुरण तालुका संगमनेर) हे धुळे येथे शांतीसागर हॉटेल येथे गाडी नादुरुस्त झाल्याने थांबले. त्यानंतर हे सर्व रस्त्यावर जाणाऱ्या एका प्रवासी वाहनातून जळगावकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पथकाने शांतीसागर हॉटेल तसेच आजूबाजूच्या हॉटेल दुकानदार यांच्याकडे आरोपींचे फोटो दाखवून विचारपूस केली असता एका चहाच्या टपरी चालकाने आरोपीचे फोटो ओळखून टपरी चालकाने त्यांना दोन हजार रुपये रोख दिल्याची माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून आरोपी ज्या शेतामध्ये थांबले होते त्या शेतात एका ओढ्यामध्ये आंघोळ करत असताना सर्वांना पथकाने ताब्यात घेतले.
पळून गेलेल्या चार आरोपींसह संगमनेरमधील अल्ताफ असिफ शेख आणि मोहनलाल नेताजी भाटी (रा. वडगाव शेरी, जिल्हा पुणे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सध्या पळून गेलेल्या आरोपीसह ६ आरोपी निष्पन्न झाले आहेत.





