आर्थिक गुन्हे शाखेचा तपास जैसे थे
नेमकं पाणी मुरतय कुठे?
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरण समोर आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. आज ना उद्या आपले पैसे मिळतील या भरोश्यावर असलेल्या ठेवीदारांचा आशावाद आता मावळला आहे. त्यामुळे ठेवीदारांनी तिसऱ्यांदा आपले गाऱ्हाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दरबारी मांडले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याचे मान्य केल्यानंतर विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय वलय असलेल्या आणि जिल्हा परिषदेचा माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या तीन महिन्यात ना मुख्य आरोपी सापडला तपासात प्रगती झाली. तर दुसरीकडे शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादी नंतर मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य काही अशा 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यातील काही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग बघता फिर्यादीवरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे सहकार खाते याप्रकरणी कोणाला पाठीशी तर घालत नाही ना असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयांसह पसार आहे. संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला असून आता त्याचे कुटुंबीय औरंगाबाद खंडपीठात जामीन मागण्यासाठी गेले आहेत. यावर अद्याप न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. त्यामुळे कुटे यानेदेखील आपला जामीन अर्ज हायकोर्टात दाखल केलेला नाही.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सुरुवातीला काही आरोपींना अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र त्यानंतर अपवाद वगळता एकाही आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अद्याप पकडू शकलेले नाहीत. त्यामुळे तीन महिन्यात या प्रकरणाच्या संदर्भात झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संस्थेतील अपहाराची रक्कम बघता आरोपी अद्यापही का बाहेर आहेत यात काही दबाव अथवा आर्थिक तडजोडीचा भाग नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारणाऱ्या ठेवीदारांनी आता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दरबारात आपले गाऱ्हाणे मांडले आहे. रविवारी काही ठेवीदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री विखे पाटील यांची त्यांच्या लोणीतील कार्यालयात भेट घेतली. या भेटीत ठेवीदार आणि मंत्री विखे पाटील यांच्यात झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात सविस्तर चर्चा झाली. ठेवीदारांनी आपल्या आर्थिक अडचणींचा पाढाच मंत्र्यांसमोर मांडला.
आमचा दिवाळीचा सण हलाखीत गेला. लेखी बाईंना आम्ही कपडालत्ता घेऊ शकलो नाही. कष्टाचे ठेवीचे पैसे मिळायला तयार नाही अपहार करणारे व मोठे कर्जदार यांना कायद्याचा धाक राहिला नाही. थकीत कर्जदारांकडून कर्जाची वसुली होत नाही. २१ आरोपी व मोठे कर्जदार यांच्यासह त्यांच्या घरातील माणसांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा. दूधगंगा पतसंस्थेची २० गुंठे जागा व इमारत जप्त करा. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी जे काही आयुधं वापरायची ती वापरा पण ठेवीदारांचा गळा मोकळा करा. सामुदायिक आत्मदहन करण्यापर्यंत ठेवीदारांची मानसिकता झाली आहे.
अशा प्रकारच्या तक्रारी ठेवीदारांनी बैठकीत पालकमंत्र्यांकडे केल्या. यापूर्वी देखील ठेवीदारांनी पालकमंत्र्यांची यासंदर्भात दोनदा भेट घेतली होती. मात्र आश्वासन पलीकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. आता तिसऱ्यांदा झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांकडून याप्रकरणी लक्ष घातले जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा या ठेवीदारांना लागली आहे.
पालकमंत्री विखे पाटील या प्रकरणी म्हणाले…
ठेवीदारांच्या चर्चेनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे बैठक आयोजित करण्याचा तसेच या बैठकीत इतर पतसंस्थांचे संदर्भ व दाखले देऊन त्या पद्धतीची कारवाई संबंधितांवर करण्यासंदर्भात योग्य मार्ग काढणार असल्याचे ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

