महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या सभांमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ आणि ‘जेबकतरा’ असा केला. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. गांधी यांना या नोटीसला शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगाने दिले.
निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय असल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले.
त्यामुळे या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठविली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यावर असत्यापित आरोप करण्यास मनाई करते,’ असे या नोटीशीत म्हटले आहे.
गांधी यांनी राजस्थानमधील बायतू येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनवती असे संबोधले होते. याशिवाय त्यांनी अतिश्रीमंतांना कर्जमाफी केल्याची देखील टीका केली होती.
निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारी त गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोप चुकीचे असल्याचे ठामपणे सांगत गत नऊ वर्षाच्या कार्यकाळात 14 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी उद्योगपतींना दिल्याचा आरोप तथ्यांवर आधारित नसल्याचे म्हटले आहे.

