महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: पहाटेच्या सुमारास धांदरफळ परिसरात बेकायदेशीर वाळूचे वाहतूक करणारी पिकअप मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तर पिकअपमध्ये असलेले तिघे मजूर पाण्यातून वर येण्यात यशस्वी झाले. विहिरीत पडलेली पिकअप वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून बेपत्ता असलेल्या चालकाचा देखील पाणबुडीच्या साह्याने शोध घेतला जात आहे.
‘अर्थ’कारणासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपला हा अपघात झाल्याची चर्चा सुरू आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी पोलिसांकडून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग सुरू असताना डंपर हिवरगाव पावसा शिवारात सुरू असलेल्या निळवंडे कालव्यात कोसळून तिघा मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाला होता, या घटनेच्या आठवणी यामुळे पुन्हा जाग्या झाल्या.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी नवे वाळू धोरण आणले असले तरी वाळू तस्करांनी या धोरणाचा पुरता फज्जा उडविलेला दिसतो. आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघातूनच प्रवरा, मुळासह अन्य नदीपात्रातून बेकायदा वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शुक्रवारी विखे समर्थक कार्यकर्त्याची वाळू तस्करी समोर आल्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा झालेल्या अपघातामुळे वाळू तस्करी चर्चेत आली आहे.
मध्यरात्री वाळूने भरगच्च भरलेली पिकअप खाली करून चालक संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याची बाब पिकअप चालकाच्या लक्षात आली. त्यामुळे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, रा. डिग्रस, ता. संगमनेर) याने पोलिसांचा पाठलाग चुकविण्यासाठी पिकअप भरधाव वेगाने नेत एका शेतात घातली. मात्र शेतातील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा पिकअपवरील ताबा सुटला, आणि वाळूची रिकामी पिकअप शेतातील सुमारे 100 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये कोसळली. विहिरीमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे पिकअप पाण्यात पूर्णतः बुडाली होती.
अपघातानंतर पिकअपमधील तिघा मजुरांनी पाणी असलेल्या विहिरीतून दोराच्या सहाय्याने वर येत आपला जीव वाचविला. मात्र पुढे असलेल्या वाहन चालकाला पाण्यातून वर येणे शक्य झाले नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. रात्रीच्या वेळी पोलिसांना मदत कार्य शक्य झाले नसल्याने सकाळी मदत कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र उशिरापर्यंत पिकअप वर काढण्यात तसेच चालकाचा शोध घेण्यास अपयश आले होते. दरम्यान या पिकअपचा पाठलाग पोलीस करत असल्याचे बोलले जात असले तरी पाठलाग करणारे पोलीस होते की अन्य कोणी होते, याबाबत देखील माहिती उपलब्ध झाली नाही.

