महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असताना देखील आपण केवळ निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर निळवंडे निर्मितीचा सर्व इतिहास समोर आहे. आता निळवंडेतून पाणी येत आहे. मात्र या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, मदत केली, तो इतिहास आपण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते, जलनायक म्हणून ओळखले जाणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, संपत गोडगे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे, विजय राहणे, निलेश शेळके, विजय रणमाळे, संजय पोकळे, विनायक काळे, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, राजेंद्र कहांडळ, संदीप कारले, डॉ. अरुण गोरडे, अरुण पोकळे, राहुल पोकळे, प्रा. बाबा खरात, डॉ. संदीप पोकळे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, पाटबंधारे राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आपण निळवंडे धरणाच्या कामाला सातत्याने गती देत धरण आणि बोगद्यांसह कालव्याची कामे पूर्ण केली. अगदी कोरोना काळातही कालव्यांची कामे सुरू ठेवली होती. अनेक वर्ष केलेल्या या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले, हा आपणा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. निळवंडे धरण हे या भागातील दुष्काळी जनतेसाठी आहे. या भागातील जनतेने पिढ्यानपिढ्या निळवंडेच्या पाण्याची वाट पाहिली आहे. पहिले रोटेशन असल्याने ओढाताण झाली मात्र यापुढे सर्वांना पाणी मिळणार आहे.
अनेक वर्षाचे कष्ट म्हणून पाणी आले असले तरी देखील निळवंडेसाठी अनेकांनी योगदान दिले आहे. पुनर्वासित शेतकरी, अकोले तालुक्यातील शेतकरी यांचे मोठे सहकार्य यासाठी मिळाले. कृती समितीने कालव्यांच्या मागणीसाठी मार खाल्ला. अनेक कष्टातून हे काम उभे राहिले आहे. हे काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. संगमनेर-अकोले व्यतिरिक्त कोणीही या धरणग्रस्तांना आपली जमीन दिली नसल्याचे सांगितले.
उत्तमराव घोरपडे म्हणाले, निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे ही फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली असून ज्यांचे निळवंडे कामांमध्ये काही योगदान नाही ते आज या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे. श्रेय घेऊ पाहणाऱ्यांनीच या कामात आडकाठ्या निर्माण केल्या होत्या. सत्तेत आल्यामुळे आज तेच लोक निळवंडेचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहे.
समन्यायी सूत्र मान्य नाही, सर्वप्रथम संगमनेरनेच केला विरोध…
आपला भाग सातत्याने दुष्काळी राहिला आहे. या दुष्काळी भागासाठी येथील धरणे बांधले गेले असून पाणी सर्वांना मिळाले पाहिजे, हे खरे असले तरी समन्यायी पाणी वाटपाचे जे सूत्र आहे ते मान्य नसल्याने आपण सातत्याने विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याला संगमनेरनेच सर्वप्रथम विरोध केला. त्यावेळी इतर सर्व गप्प होते. या कायद्याविरोधात संगमनेर तालुका न्यायालयीन लढाई देखील लढत असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

