महाराष्ट्र संवाद न्यूज
महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. आता मात्र राजकारणाच्या नावावर समाज व जाती वेगळ्या केल्या जात आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले.
संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अभिवादन व प्रकट मुलाखती दरम्यान फुटाणे बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शेतकरी कवी भरत दौंडकर, ॲड. आर. बी. सोनवणे, तुळशीनाथ भोर, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सिताराम वर्पे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. संजय मंडकमाले, जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, अंजली कन्नावर, नामदेव गायकवाड, प्रा. बाबा खरात, प्रा. केशवराव जाधव, एस. टी. देशमुख, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. जे. बी. गुरव आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फुटाणे म्हणाले, सध्या आरक्षणाच्या नावावर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा समाजाचे आंदोलन हे एका समाजाचे नसून ते कोरडवाहू शेतकऱ्यांच्या गरीब पोरांचे आंदोलन ठरत आहे. जास्तीचे आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राने राज्य सरकारला द्यायला हवे. समाजातील प्रत्येक गरिबाला आरक्षण द्यावे. या आरक्षणाला कालमर्यादा असावी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला. मात्र ज्यांनी काहीच काम केले नाही ते फक्त आज टीका करताना दिसत आहे. फुटाणे यांनी यावेळी आपल्या कवितांमधून सध्याची राजकीय परिस्थिती, आरक्षण, जात व्यवस्था यावर परखड ताशेरे ओढले.
आमदार थोरात म्हणाले, संगमनेरच्या प्रगतीमध्ये यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा आहे ज्यांचे योगदान आहे त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो त्याकाळी कोणते दळणवळणाचे साधन नसताना यशवंतरावांनी महाराष्ट्रातील माणसे हेरली, सहकार वाढविला. राज्याच्या राजकारणात एक काळ असाही होता की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जुगलबंदी चालायची. मात्र आपसात मैत्रीपूर्ण संबंध होते. सध्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाने राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. सध्याचे राजकारण पाहून चिंता वाटते.
माजी आमदार तांबे म्हणाले, उत्तम साहित्यिक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. पंचायतराज व्यवस्थेसह औद्योगिक वसाहतींची निर्मिती त्यांनी केली. यावेळी दौंडकर यांनी देखील कविता सादर केल्या.

