महाराष्ट्र संवाद न्यूज
पर्जन्य छायेमुळे सातत्याने दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानादेखील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला गेलेला ग्रामीण विकास आणि तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या पॅटर्नचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
नाबार्डच्या मुंबई विभागीय शाखेतील अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने शनिवार व रविवारी अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध सहकारी संस्थांना भेटी देत पाहणी केली. मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर आदींचा साठ अधिकाऱ्यांचा या अभ्यास गटात समावेश होता.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे येथील दूध संस्था दूध संकलन केंद्र अहमदनगर जिल्हा बँकेची शाखा व विविध पतसंस्थांसह सहकारी व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्या भेटीचा समारोप करण्यात आला.
राकेश सिंग म्हणाले, ग्रामीण भागातील सहकार अनुभवणे हा एक अद्भुत अनुभव आहे. एसीमध्ये बसून अनेक अधिकारी सहकार क्षेत्राचे कामकाज पहात असताना प्रत्यक्षात सहकार भूमीत येऊन सहकारी संस्थांचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी संगमनेरचा सहकार हे एक मॉडेल आहे. अमृत उद्योग समूहाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात मोठी प्रगती साधली असून संगमनेरचा हा पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अशा संस्थांना नाबार्डने सहकार्य केल्यास देशाचा विकास खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचेल.
आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर संगमनेरच्या सहकाराचे कामकाज चालत आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या विकासात जसे थोरात यांचे तीन पिढ्यांचे योगदान आहे तसाच नाबार्डचाही अप्रत्यक्षरित्या खूप मोठा वाटा आहे. नाबार्ड व जिल्हा सहकारी बँकेने सातत्याने वेळोवेळी मदत केली आहे. नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी विविध सहकारी संस्थांना मोठी मदत झाली असल्याचे ते म्हणाले.

