महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – दि. १० डिसेंबर
संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्यावतीने कै. चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जाणारे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा निवड समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी केली.
संगमनेर येथील ज्येष्ठ संपादक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल शेवाळे यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठीचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नगर येथील महाराष्ट्रातील नामवंत नाट्यकर्मी आयुब शेख व अकोले येथील डॉ. उल्हास कुलकर्णी यांना नाट्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विठ्ठल शेवाळे हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांनी उज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. शासनाच्यावतीने आढळा नदीच्या अभ्यास प्रकल्पासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे. आयुब खान हे अहमदनगर येथील रहिवासी असून नाट्य क्षेत्रासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांना नाट्य गौरव तर डॉ. उल्हास कुलकर्णी हे अकोल्यात वैद्यकीय सेवा बजावत असून नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी आणि तरुण पिढीला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारती बाबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी वर्पे हिने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिला या निमित्ताने सन्मानित केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील एकपात्री कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी दिली.
यासाठी पाचवी ते आठवी, नववी ते बारावी आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये एकपात्री सादरीकरणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाज प्रबोधनाच्या दृष्टीने विषय निवड करून स्पर्धकांना आपली कला सादर करता येणार आहे. यात यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांसाठी बक्षीसे दिली जाणार आहेत.
फाउंडेशनच्या पुरस्कारासाठी निवड समितीत सदस्य म्हणून पत्रकार संदीप वाकचौरे, डॉ. माधवी देशमुख, डॉ. विशाल मुटकुळे, सूर्यकांत शिंदे यांनी काम पाहिले. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

