संगमनेर, प्रतिनिधी-
येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेरच्या वतीने आयोजित ‘बोलक्या बाहुल्या’ या पपेट शो कार्यक्रमास पालक आणि बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
सह्याद्री कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांनी आपल्या बाहुल्यांच्या माध्यमातून नागपंचमी, होळी, अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग, लावणी, हिंदी गीते आणि देशभक्तीपर गीतांची जोड देऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन आणि प्रबोधनाचा हा अनोखा मिलाफ बालकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला.
या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, डॉ. विवेक वाकचौरे, अरविंद गाडेकर, प्रा. अरुण लेले, दर्शन जोशी, शशांक गंधे, प्रकाश पारखे, प्रा. आसावरी रत्नपारखी, सुप्रिया गवांदे, नंदाताई मेंद्रे, अनघा खेडकर, प्रा. जितेंद्र पाटील, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंटे आणि राजेंद्र खोसे आदि मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यातून ज्ञान, रंजन आणि प्रबोधनासोबतच मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सातत्याने बालकांसाठी दर्जेदार उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी आगामी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आणि संगमनेरकर नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
संस्थेची नवीन सदस्य नोंदणी सध्या सुरू असून इच्छुकांनी ८९८३७७१२५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपली नोंदणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लवकरच होणाऱ्या कथाकथन कार्यशाळेत कथा कशी निवडावी आणि ती कशी सादर करावी, याचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांच्यासह कथाकथनकार शांताराम डोंगरे, सौरभ म्हाळस, डॅनियल खरात तसेच काशेश्वर विद्यालय, कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोखरी हवेली आणि न. सो. कळसकर शाळेच्या मुख्याध्यापकांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविधा आरसिद्ध यांनी केले तर दर्शन जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून, मोठ्या संख्येने रसिक श्रोते, पालक व विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते.





