महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – दि.११ डिसेंबर
आत्तापर्यंत आपण शिक्षण आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करून जीवन जगत आलो आहोत, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेशी (Artificial Intelligence) स्पर्धा करून, आपल्याला स्वतःची व्यावसायिक उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. भारतीय मुले ही कष्टाळू व बुद्धिमान आहेत, ती हे आव्हान लीलया पेलतील. मात्र त्यांना या परिस्थितीत ताणतणावाचे व्यवस्थापन करणारे आनंददायी शिक्षण द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
गुरु एज्युकेशन पुणे व एक्सपर्ट अबॅकस फाउंडेशन संगमनेर-अकोले यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, उद्योजक सुदीप वाकळे, प्रकाश नवले, एक्सपर्ट अबॅकस फाउंडेशनच्या संचालिका कल्याणी नवले तर अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले उपस्थित होते.

उद्योजक सुदीप वाकळे म्हणाले, स्पर्धेच्या या युगात पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक मुलाची एक उपजत गुणवत्ता असते, ती हेरून त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये.
सुनील कडलग म्हणाले, विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घातले पाहिजे. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली तर त्याला नैराश्य येऊ शकते. पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्याच्या पातळीवर जाऊन, मित्र होऊन त्याच्या आवडीनुसार त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहन द्यावे म्हणजे त्याचे भवितव्य उज्वल होऊ शकेल.
यावेळी झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धांमध्ये वैभवी रमेश कानवडे व नम्रता गोपाळ गोरडे यांनी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हा किताब पटकावून सायकलचे पारितोषिक पटकाविले. याशिवाय समृद्धी भोर, मेघा सहाने, मनीषा हासे, काव्या बडे, रुद्र डगळे, ऋत्विक वरसाळे, हर्षवर्धन काळुसे, दक्ष दिवटे, स्नेहा जाधव, आराध्या चौधरी, ओम देशमुख, अपूर्वा देशमुख, यश कानवडे, ईश्वरी कानवडे, प्रिया शिंदे, इशिता भळगट, श्रेया अरगडे, दर्शन गोपाळे, नव्या गोपाळे, अनघा सहाने, मनीष हासे यांनी देखील बक्षीस मिळविली.
कल्याणी नवले यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र पाटील यांनी तर आभार राकेश नवले यांनी मानले.

