महाराष्ट्र संवाद न्यूज
साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर शेतकऱ्यांनी वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राजहंस व अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खते बाजारामध्ये उपलब्ध असून शेतकऱ्यांना ते अवघ्या पन्नास टक्के अनुदानावर प्रति एकरी एक मेट्रिक टन मिळणार आहे.

याशिवाय २०२३-२०२४ या हंगामातील लागवडीचा ऊस तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी उसाचा शास्त्रोक्त पद्धतीने खोडवा निडवा ठेवणे गरजेचे असल्याने यासाठी कारखान्याच्या शेतकी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले असून कारखान्याच्या विविध योजनांसाठी कारखान्याच्या कृषी विभाग किंवा गट ऑफिसची संपर्क साधण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

