महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : शुक्रवारी होणाऱ्या लग्न समारंभासाठी नवरदेवाला विवाहस्थळी पाठविण्यासाठी निघालेल्या वराच्या मिरवणुकीत असलेल्या डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली समोरचे वऱ्हाड चिरडले गेले. चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.
ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८ वर्ष) व भास्कर राधु खताळ (वय ७३ वर्ष) अशी मृतांची नावे असून जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या. पाठोपाठ त्यांच्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात जखमींना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचा शुक्रवारी तालुक्यातील रणखांब येथे विवाह असल्याने गुरुवारी सायंकाळी नवरदेवाची मिरवणुकीने विवाह स्थळी पाठवणीची मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. डीजेच्या निनादात मिरवणूक सुरू असताना डीजे चालकाचे डीजेवरील नियंत्रण सुटल्याने डीजे असलेले वाहन थेट मिरवणुकीतील गर्दीत घुसले. यावेळी डीजे असलेल्या वाहनाने अनेकांना चिरडले. काही क्षणातच हा प्रकार घडल्याने घटनास्थळी एकच कोलाहल माजला.
डीजे खाली सापडल्याने दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने वधु-वराकडील कुटुंबासहित नातेवाईकात व संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
झालेली घटना दुर्दैवी… आमदार थोरात
धांदरफळ खुर्दमध्ये झालेली घटना ही अत्यंत वेदनादायी व दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

