महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतणाऱ्या काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांनी अद्याप प आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुख्य सूत्रधार यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिर्डीच्या डीवायएसपींना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आश्वी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २ जानेवारीला झालेल्या एका कार्यक्रमाहून परतत असताना सचिन चौगुले व रमेश आरणे यांच्यावर लोणीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राजकीय द्वेषातून व पूर्वनियोजित कट करून संगनमताने हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. शिर्डी मतदारसंघात नेहमीच राजकीय विरोधकांवर अशाप्रकारे हल्ले करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. हल्ल्याच्या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांकडून अद्याप कोणत्याही आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, बाळासाहेब गायकवाड, सचिन कोते, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, संपत हिंगे, नानासाहेब नळे, सिमोन जगताप, मुन्ना फिटर, किशोर वाघमारे, निलेश डांगे, अनिल बोठे, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, अमोल आरणे, संजय कोल्हे, रशीद इनामदार, महेंद्र गोरडे, संदीप कोकाटे, भागवत ठोंबरे, भीमराज राहिंज, अविनाश शेजवळ, सुनील परदेशी, भानुदास कातोरे, संतोष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हल्ल्याचा आरपीआय गवई गटाच्यावतीने निषेध करत असून आरोपींना अटक न झाल्यास यापुढे होणाऱ्या आंदोलनात आमचा सहभाग असेल असे आरपीआय गवई गटाचे उत्तर जिल्हा सरचिटणीस किशोर वाघमारे यांनी सांगितले.

डॉ. एकनाथ गोंदकर म्हणाले… पालकमंत्र्यांच्या गावात अशा प्रकारे एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला होणे निंदनीय आहे. जखमींनी हल्लेखोरांची नावे सांगू नये त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही हा एक वेगळा प्रकार मतदारसंघात सध्या सुरू आहे. आरोपींना अटक होत नाही त्यामुळे लोकांच्या भावना अतिशय तीव्र बनल्या आहे.
ॲड. पंकज लोंढे म्हणाले… शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये राजकीय विरोधकांवर नेहमीच अशा प्रकारचे हल्ले करण्यात येऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. असा हल्ला जर सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर झाला असता तर पोलिसांनी आरोपीच्या घरातील व्यक्तींना व नातेवाईकांना काही एक कारण नसताना त्रास दिला असता जखमींनी आरोपींना ओळखून त्यांची नावे सांगूनही आरोपींना अद्याप पावतो अटक झाली नाही ही खेदाची बाब आहे.

