महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : केंद्रात आजपर्यंत सहकार खाते नव्हते. राज्याच्या खत्यारीत येणाऱ्या खात्यात केंद्राचा हस्तक्षेप नको ते कायद्याविरोधात केंद्राच्या सहकारातील हस्तक्षेपाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. हुकूमशाही प्रवृत्तीने देश चालविल्याने देशाची अधोगती होते. देशाची घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आपण यापुढील काळात काँग्रेस सोबत असणं आवश्यक आहे. मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला लागेल, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संगमनेरमध्ये व्यक्त केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सिद्धरामय्या संगमनेरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजेश राठोड, आमदार झिशान सिद्दिकी, आमदार माधवराव जवळगावकर, शिरीष चौधरी, मधुकर चव्हाण, मोहन जोशी, सुरेश कावरे, शोभा बच्छाव, सचिन सावंत, अतुल लोंढे, रशीद ताहीर, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदिसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने माजी आमदार उल्हास दादा पवार यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने जैन उद्योग समूहास व सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे केंद्राला ते कायदे परत घ्यावे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारावरअतिक्रमण करत आहे. आज देशाची घटना आणि लोकशाही धोक्यात आली असून कर्नाटकमध्ये आमदार खरेदी करून सत्तेवर आलेल्या तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या सरकारच्या ४०% कमिशनचा मुख्य मुद्दा करत आम्ही कर्नाटकच्या जनतेला सत्ता बदलाचे आवाहन केले आणि कर्नाटकने भ्रष्ट सरकार हटवत काँग्रेसला सत्तेवर आणले. सत्तेवर येताच आम्ही जनतेला दिलेली पाच महत्त्वाचे आश्वासने देखील पूर्ण केली.
ब्रिटिशांच्या तावडीतून देश वाचविण्याचे काम काँग्रेसने केले. कोणत्याही अन्य पक्षाचा यात सहभाग नव्हता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी राज्यात आदर्शवत काम उभे केले. तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे देशाच्या विकासातील महिलाचा दगड ठरले आहे. सामान्य माणसांच्या विकासासाठी या जोडगोळीने काम केले आहे. सहकाराच्या माध्यमातून आज सामान्य माणसाची पत वाढली आहे. सहकार आणि देशाच्या उभारणीत या दोन्ही व्यक्तींचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले.

