महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संगमनेरकरांना रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची जोरदार राजकीय फटकेबाजी ऐकावयास मिळाली.
शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, संस्था उभ्या करणे सामान्य गोष्ट नाही. सहकारातून संगमनेरचा विकास साधला गेला आहे. त्यामुळे बाजूच्या मतदार संघातून येथे स्पर्धा होत असली तरी आमदार बाळासाहेब थोरात अतिशय थंड डोक्याने ऑपरेशन करतात. त्यामुळे ऑपरेशन तर होतच पण रक्तही येत नाही. एकीकडे दोन माणसं एकत्र आल्याने देशाचं वाटोळ झाल आहे तर, दुसरीकडे दोन माणसांनी एकत्र येत येथे नंदनवन घडविले.

खोटा इतिहास सांगितला जात आहे. देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याची भलावन केली जात आहे. तर मग महात्मा गांधींच्या चळवळी सोबत अनेक लोक जेलमध्ये कशाकरता गेले होते? ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तुरुंगवास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात असा टोलाही भाजपला लगावला.
दोन माणसं एकत्र येतात त्यावेळी देशाचे वाटोळे होते तर येथे भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे या दोन माणसांनी एकत्र येऊन नंदनवन निर्माण केले. या माध्यमातून पुढच्या सात पिढ्यांना संजीवनी दिली गेली. भाऊसाहेब थोरात यांनी आपले आमदारकी सोडत शेतकऱ्यांसाठी सहकारात काम केले. भाऊसाहेब व अण्णासाहेब यांनी या भागाचे सोने केले.
सुरुवातीलाच राम कृष्ण हरी असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून एखादा भाग कसा बदलतो त्याचे उत्तम उदाहरण संगमनेर आहे. सहकारामुळे राज्याची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बदलली आहे. एकीकडे देश महात्मा गांधींना विसरतो की काय अशी भीती असताना दुसरीकडे बाळासाहेब थोरात महात्मा गांधींच्या स्मृती जागवत आहेत.

सकाळी एक घर, संध्याकाळी दुसरे घर तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिसरीकडे, अशी सध्याची अवस्था असल्याने सध्या राज्याच्या राजकारणाला कीड लागली आहे. तुमचं वय झालं तुम्ही आता घरी बसा. बापाला घरी बसा सांगणारा पोरगा जन्माला येऊ शकत नाही. त्यांनी पद तर तुम्हालाच दिलीत ना? असा सवाल करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. गांधीवाद नेहरू पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान आहे. त्यांच्यासोबत मी उभा आहे.
खर तर मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही, अडचणीच्या काळात लोक साथ सोडतात. मात्र आज बाळासाहेब थोरात यांनी जो आधार दिला त्याची मला गरज होती. मरण आलं तरी चालेल पण विचारांशी तडजोड करणार नाही. अहंकारी नेते या महाराष्ट्राला घरी बसवावे लागतील. देशाला फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचा विचार वाचवू शकतो, असे देखील ते म्हणाले.

