महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : भव्य दिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एलईडी इफेक्टसह भरतनाट्यमने सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आसामी बिहू नृत्य, भांगडा, लावणी, धनगरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बासरी वादन, फ्युजन डान्स, गवळणी या एकापेक्षा एक सरस समूह नृत्यांच्या सादरीकरणाने जयंती महोत्सवातील आनंद सोहळा ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमात एकच धमाल झाली.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित युवा जल्लोष आनंद सोहळा संस्मरणीय झाला यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, शरयूताई देशमुख, गणेश मादास, शोभाताई कडू, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, सतीश गुंजाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात भरतनाट्यमसह अमृतवाहिनीच्या स्कूलची ही मायभूमी या गीताने महाराष्ट्राची परंपरा दाखवली. विद्याभवनच्या शिवतांडव स्तोत्रणे सर्वांच्या अंगावर शहारे आणले. खळी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिवजन्मोत्सवाचे गीत स्फूर्तीदायी झाले तर साकुरच्या आदिवासी नृत्याने धमाल केली. सह्याद्रीतील चिमुकल्यांनी केलेला कोळी डान्स सर्वांची वाहवा मिळून गेला.
संग्राम मूकबधिर विद्यालयाच्या मतिमंद विद्यार्थ्यांनी सादर केलेले भरतनाट्यम कौतुकास्पद ठरले. इंटरनॅशनल स्कूलची मंगळागौर लक्षवेधी झाली. नांदुरी दुमाला येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा फनी डान्सने सर्वांना खळखळून हसवले. चंदनापुरी विद्यालयाने सादर केलेल्या नमोदेवी कार्यक्रमातून भारतीय परंपरेचे दर्शन घडले तर निमोन विद्यालयाने शिवजन्माचा पाळणा सादर केला. बी फार्मसी विद्यार्थिनींची मंगळागौर आणि रहिमपूर विद्यालयाचे धनगरी नृत्य लक्षवेधी ठरले.

वडगाव पान विद्यालयाने सादर केलेले दाखवा बोटीने फिरवाल या गीताने धमाल केली. पॉलिटेक्निकच्या वेस्टर्न संगीताला टाळ्यांची दाद मिळाली. सह्याद्री विद्यालयाच्या चिमुकल्यांनी मुंबईसे आयलो या कोळीगीताने सर्वांना ठेका धरायला लावला. इंजिनिअरिंग कॉलेजचे हिप हॉप आणि कोल्हेवाडी विद्यालयाचे नगाडा संग ढोल बाजे या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. मॉडेल स्कूलच्या आम्ही गड्या डोंगरात राहणार चाकर शिवबाचा या गीताने डोळ्यात पाणी आणताना अंगावर शहर आणले. वीरभद्र विद्यालयाच्या विद्यार्थिनीने सादर केलेली लावणी आणि चंदनापुरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले वंदे मातरम संस्मरणीय ठरले.
यावेळी सेक्रेटरी किरण कानवडे,भास्करराव पानसरे, दत्तात्रय चासकर, रामदास तांबडे, नामदेव गायकवाड, एम. के. गुंजाळ, विजय पिंगळे, संजय आहेर, किसन खेमनर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदक प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांच्या सुंदर निवेदनाने कार्यक्रम श्रवणीय झाला. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

