महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर : राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, प्रचलित धोरणाप्रमाणे गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यात बाह्य हस्तक्षेपला संधी नाही. तरीदेखील याप्रकरणी एक आमदार तीस लाख, वीस लाख दिल्याचे आरोप करत आहे. त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी असून अशा प्रकारे सरकारवर बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठीपदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहो, हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नियुक्त करावेत. आमची काही हरकत नाही. परंतु आता ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही.

विखे पाटील म्हणाले, तलाठी पदासाठी यापूर्वी सन २०१७ व २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली. त्याच पद्धतीने सध्याही प्रक्रिया राबवली जात आहे. ‘टीसीएस’ या त्यावेळच्या कंपनीकडेच ही प्रक्रिया सोपवली गेली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. ४ जानेवारीला प्रक्रिया पूर्ण झाली. ५७ अवघड प्रश्नांचे सामान्यीकरणाद्वारे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये विसंगत काही नाही. त्यातूनच ४८ उमेदवारांना २०० पेक्षा अधिक म्हणजे २१४ गुण मिळाले आहेत. भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही. आरोप करणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी.

