महाराष्ट्र संवाद न्यूज
श्रीरामपूर : संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत राजकीय प्रतिष्ठितांनी केलेल्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असतानाच आता लगतच्याच श्रीरामपूरमधील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सनी किशोर अंबिलवादे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, आशिष सुरेश क्षीरसागर, उमेश गणपत मैड, प्रसाद दिलीप नागरे, अनंत विठ्ठलराव निकम, संजीव शामराव साळवे, स्नेहलता प्रकाश कुलथे, संगीता आनंद माळवे, सचिन वसंतराव अहिरराव, गणेश विठ्ठलराव भिसे (पदसिद्ध संस्थापक), विजय रामभाऊ नागरे, प्रकाश बाबुराव कुलथे, अभिजीत राजन माळवे यांच्यासह जबाबदार व्यक्तींचा आरोपीमध्ये समावेश आहे.
आंबिलवादे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंबीय १७ ऑगस्ट २०२० पासून संस्थेचे ठेवीदार आहेत. फिर्यादीच्या वडिलांनी शेती विकून आजारपणावरील उपचारानंतर राहिलेले पैसे पतसंस्थेच्या संचालक मंडळाशी असलेल्या नातेसंबंधामुळे संस्थेत मुदत ठेवीच्या रूपाने गुंतविले होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पतसंस्थेतील मुदत ठेव पावत्या फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या नावावर करण्यात आल्या होत्या. एकूण ४ लाख २३ हजार २१६ रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या मुदतीनंतर परत मुदत ठेवीच्या रूपाने ठेवल्या होत्या.

मुदत ठेवीची मुदत संपल्याने आणि पैशाची गरज भासल्याने ठेवीदाराने संस्थेकडे ठेवीच्या रकमेची मागणी केली असता संचालक मंडळाने देऊदीलाऊची भाषा करत पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने वारंवार संचालक मंडळातील सदस्यांशी संपर्क करत पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. याच दरम्यान संस्थेतील आणखी काही ठेवीदार सुभाष सिताराम लांडगे, पांडू नवनाथ धनवटे, सचिन विष्णू कांबळे, अब्बास लालखान पठाण यांना देखील अशाच प्रकारे ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे फिर्यादीने संस्थेतील आणखी काही ठेवीदाराकडून माहिती घेतली असता ठेवीची रक्कम संचालक मंडळाने स्वतःसाठी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर परस्पर बेकायदेशीर कर्ज वितरित करून वापरली, तसेच आमची ठेवीदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी पतसंस्थेचे संस्थापक, संचालक यांच्या विरोधात फसवणूक व एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूरच्या सहकारी पतसंस्था विश्वात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

