महाराष्ट्र संवाद न्यूज
राहता: बिबट्याच्या संचारामुळे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभागाने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम महसूल मंत्र्यांच्या लोणीमध्ये दिसून आला. भर लोकवस्तीत आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या गोसावी वस्तीवर रविवारी सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या बालकाच्या मृत्यूकडे वनविभागाचा निष्काळजीपणा म्हणून बघितले जात आहे.
अथर्व प्रवीण लहामगे असे या बालकाचे नाव आहे. लोणी बुद्रुकमध्ये प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर गोसावी वस्ती आहे या वस्तीवर राहावयास असलेल्या लहामगे कुटुंबातील अथर्व हा चिमूरडा सायंकाळी खेळण्यासाठी संदीप गोसावी यांच्या घरी गेला होता.

त्यानंतर गोसावी यांच्या मुलासोबत तो दूध आणण्यासाठी गेला होता. दूध घेऊन आल्यानंतर गोसावी यांचा मुलगा घरात दूध देण्यासाठी गेला. त्यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर त्याने इतरत्र बघितले असता त्याला त्याचा सहकारी अथर्व दिसून आला नाही, त्यामुळे तो घरी गेला असावा असे त्याला वाटले.
इकडे बराच वेळ अथर्व घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता अथर्व घरी जाऊन बराच वेळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला असता, रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संदीप गोसावी यांच्या मालकीच्या मक्याच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत अथर्व आढळून आला. त्याला लगेचच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले.
या घटनेमुळे लोणी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोपरगाव वन विभाग परीक्षेचा वन अधिकारी सागर केदार यांनी धाव घेतली. नागरिकांच्या मागणीनंतर तात्काळ पिंजरा लावला गेला असता तर या निष्पाप बालकाचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


